नवी दिल्ली: “कोविड-19′ च्या सामुहिक प्रादुर्भावाला भारताकडून आतापर्यंत यशस्वीपणे रोखले गेले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. संसर्गामुळे झालेला वर्तणूकीतील बदल हा आरोग्यदायी समाजासाठी नव्यने सर्वसामान्य होऊ शकतो, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
जर भारतीयांनी हात, श्वसन आणि पर्यावरणाची स्वच्छता आत्मसात केली आणि दररोजच्या जीवनात त्याचा अभ्यास केला तर ही साथ ओसरल्यावर मागे वळून बघितल्यास करोना विषाणूची साथ ही देशासाठी ईष्टापत्तीच ठरल्याचे लक्षात येईल, असे हर्षवर्धन म्हणाले. लॉकडाऊनची 17 मे रोजीची वाढीव मुदत संपल्यानंतर देशवासियांनी अर्थव्यवस्थेबरोबरच स्वतःच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असणार आहे. सरकारला दोन्ही बाबींमध्ये समतोल राखावा लागेल, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
करोनाचा मुकाबला करणे म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे, हे आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आले असेल. या साथीमुळे आपल्या वर्तनातही सकारात्मक बदल घडू लागले आहेत. त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोकाही कमी होईल, त्यामुळे समाजात आरोग्य सजगता वाढीस लागेल, असे ते म्हणाले.
देवी आणि पोलिओ व्यतिरिक्त या देशातून इतर सर्व विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नष्ट झालेला नाही. इतर रोग पुन्हा पुन्हा नव्या स्वरुपात येतच असतात. करोनाही नव्या स्वरुपात येऊ शकतो. मात्र आता ज्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत, त्यामुळे भविष्यात या विषाणूचा सामना करणे शक्य होईल.मद्यविक्री सुरू झाल्यावर दुकानांबाहेर लागलेल्या रांगांवर त्यांनी टीकाही केली.