मुंबई – करोनाचा धोका असल्याने आपल्याला आपापल्या घरातच राहावे लागत आहे. त्यामुळे कदाचित मानसिक नैराश्य देखील आले असेल. मात्र, त्यामुळे खचून जाऊ नका, परिवाराच्या सोबत राहा व मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, या जगात शाश्वत असे काहीही नसते, म्हणून जो क्षण मिळतो तो आनंदाने जगून घ्या, अशा शब्दात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी देशवासियांना करोनाविरुद्धचा लढा निश्चितच जिंकू, पण त्यासाठी सकारात्मकता सोडू नका असा सल्लाही दिला आहे.
जगभरात करोनाने थैमान घातले आहे. भारतातही हा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे तर सगळ्यांनाच सध्या घरातच राहावे लागत आहे. कित्येक दिवस घरातच थांबल्याने अनेकांना नैराश्य आले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता सरकार व सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. अनावश्यक घरातून बाहेर पडू नका. आपल्या परिवारासह प्रत्येक क्षण आनंदाने जगा. करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर परिवाराला वेळ द्यायला जमेलच असे नाही त्यामुळे मिळालेला प्रत्येक क्षण जगून घ्या कारण या जगात शाश्वत अशी एकही गोष्ट नाही, असेही शास्त्री यांनी सांगितले.
करोनावर नियंत्रण राखण्यासाठी अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही. त्यामुळे घरातच राहणे हा एकच उपाय सध्यातरी आपल्या समोर आहे. करोनाचा नायनाट कधी हेइल त्यावर काही औषध मिळाले तसेच ते कधी मिळेल, याबाबत कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे विनाकारण धोका पत्करू नका. सरकारला सहकार्य करा व आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका, असेही शास्त्री यांनी सांगतिले आहे.
वर्तमानात जगा…
करोनाचा धोका कायम आहे, त्यामुळे सध्यातरी भविष्याचा विचार करू नका तर वर्तमानात जगा. आपण पुढील काही वर्षांचा विचार करतो. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवसांनी काय होणार याचा आपल्याला सध्या अंदाजही लावता येत नाही, त्यामुळे जे मिळत आहे त्यासाठी आभारी राहा व कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका, असा सल्लाही शास्त्री यांनी दिला आहे