कोपरगाव: तालुक्यात विदेशासह मुंबई-पुण्यावरून आलेल्या नागरीकावर संपुर्ण शासकीय यंत्रणेने करडी नजर ठेवली आहे. तालुक्याला करोनाची लागण होवू नये, यासाठी विषेश खबरदारीचा उपाय म्हणुन आता नव्याने बाहेरून आलेल्या नागरीकांनाच्या हातावर शिक्के मारुन त्यांना घरात बसण्याच्या कडक सुचना आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहीती देताना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णाफुलसौंदर पुढे म्हणाले की,करोना संसर्गजन्य प्रादुर्भाव रोकण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क आहे. दिवसेंदिवस देशासह राज्यात करोनाचे रूग्ण वाढत आहेत मात्र कोपरगाव तालुक्यात एकही करोनाचा रुग्ण बाधीत नाही. गेल्या एक महीण्यापासुन शहरासह तालुक्यात विदेशातून ५३ नागरीक आले आहेत पैकी ३५ नागरीक शहरातील तर १८ ग्रामीण भागातील आहेत या ५३ पैकी ३७ नागरीकांची तपासणी करण्यासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. या सर्वांना करोनाची बाधा कोणतीही बाधा झाली नसल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल आला आहे. तरीही त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
सध्या मुंबई- पुणे येथून गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्यामुळे करोनाची बाधा तालुक्याला होवू नये म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या हातावर शिक्के मारुन घरी सोडले जात आहे तसेच त्यांना १४ दिवस घरी बसण्याच्या सुचना दिल्या आहे. नागरीक करोनाच्या धोक्याची गंभिरता समजून घेत नाहीत. वारंवार सांगुनही घराबाहेर, रस्त्यावर विनाकारण मोकाट फिरत आहेत हे सर्वांसाठी धोकादायक आहे.नागरीकांनी घरात बसुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.फुलसौंदर यांनी केले आहे.
दरम्यान किरकोळ सर्दी,खोकला, ताप आला तरी नागरीक करोनाच्या भितीपोटी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. गर्दी कमी होण्या वजी वाढवली जात आहे. एक व्यक्ती किरकोळ आजारी असला तरी त्यांच्या सोबत दोन चार जन येवून गर्दी करीत आहे. समजावून सांगणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्या बरोबर हुज्जत घालण्याचे प्रकार होत आहेत.