पुसेगाव – समाजात सर्व महिलांना समानतेची वागणूक तसेच मानसन्मान मिळायला हवा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निढळ येथील महिला मेळाव्यात केले. निढळ (ता. खटाव) येथे महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त मेळाव्याच नियोजन केले होते. जीवनज्योती महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी महिलांनी संपूर्ण गावात रॅली काढली. कार्यक्रमाची सुरुवात तेजस्वी सातपुते, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, माजी आयुक्त चंद्रकांत दळवी, या प्रमुखांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रामस्थांच्यावतीने दळवी यांच्या हस्ते तेजस्वी सातपुते, चंद्रहार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय संस्कृतीत स्त्रीला विशेष महत्व आहे. निढळसारख्या गावात महिलांची कार्य करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये काम करण्याची असलेली धमक प्रकर्षाने जाणवली, असे सांगून सातपुते म्हणाल्या, “”दळवी यांनी राबविलेल्या ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियान आणि झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल या योजना राज्यासाठी पथदर्शी ठरल्या. तुम्हा सर्वांचे संघटन आहे.
एखाद्या गावाचा सर्वांगीण विकास होत असताना ग्रामस्थ, महिलांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करुन दाखविले आहे.” महिला सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा विषय आहे. समाजात अनेक समाजकंटक वावरतात, छेडछाड करणे, अर्वाच्य भाषा बोलणे अशा घटना घडतात. त्यावेळी महिला अन्याय सहन करतात. पण कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. महिलांचे एकमत झाल्यास दारूबंदी शक्य आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत जवळच्या पोलिस ठाण्यात संबधित पोलिस अधिकाऱ्यांना भेटून माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रहार पाटील म्हणाले, “”महिलांना समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे. महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या भागातसुद्धा निढळसारखे ग्रामविकासाचे मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे.” श्री. दळवी म्हणाले, “”आपल्या कुटुंबासाठी या माताभगिनींचे योगदान कोणालाही विसरुन चालणार नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत काबाडकष्ट करणारी, संसारासाठी धडपडणारी महिला आपला अभिमान आहे. महिलांनी समाजकार्यात पुढे येऊन काम करावे.
महिलांनी फक्त घरचे काम करायचं का, त्यांनी फक्त संसारगाड्यात अडकून पडायच का? त्यांनी घराबाहेर पडावे समाजासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी काम करावे.” महिलांसाठी विविध योजना आखून त्यावर सर्वजणांनी काम करावयाचे आहे. प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम झाली पाहिजे. त्यासाठी पुरुषांनींसुद्धा त्यांना साथ देण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.