पुणे : मिळकतकर थकबाकीदारांसाठी “अभय’ योजना राबविण्यास महापालिकेने नकार दिला आहे. त्याबाबतचा अभिप्राय मिळकतकर आणि संकलन विभागाकडून स्थायी समितीत ठेवला आहे. दरम्यान, घटलेल्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबविण्यासाठी सत्ताधारी भाजप सकारात्मक असल्याने या प्रस्तावावर समिती काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
पालिकेच्या मिळकतकराची थकबाकी सुमारे 4 हजार 200 कोटी झाली आहे. यामध्ये सुमारे 1900 कोटी मुळ मिळकतकर असून उर्वरित 2100 कोटी त्यावरील दंड आणि व्याज आहे. त्यातच ही थकबाकी रक्कम त्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याजामुळे दरवर्षे सुमारे 27 टक्के वाढत आहे. त्यामुळे वसुली तसेच थकबाकी भरल्यानंतर थकबाकीदार नियमित पैसे भरण्यासाठी अभय योजना राबविण्याची मागणी करणारे प्रस्ताव स्थायी समितीत देण्यात आले होते. समितीने हे प्रस्ताव प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविले होते.
मात्र, प्रशासनाने त्याबाबत नाकारात्मक भूमिका घेतली असून यापूर्वी राबविलेल्या 2 अभय योजनांमधून पालिकेस अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. याशिवाय, अशाप्रकारे वर्षाच्या अखेरीस अभय योजना राबविणे म्हणजे प्रामाणिक कर भरणाऱ्यांवर अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे ही योजना राबविणे योग्य नसल्याचे नमूद करत आपला अभिप्राय स्थायी समितीत दिला आहे.