मुंबई: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या १०-१५ वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात. त्यामुळं त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. एकतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते, दुसरीकडे त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत असल्याने काही जणांचे घटस्फोटही होत आहेत. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.
दरम्यान रोहित पवारांनी बदल्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये शिक्षक पती-पत्नीला पूर्वीप्रमाणे प्राधान्य देण्याबाबत धोरण ठरविण्याची मागणी केली. हसन मुश्रीफ यांनी देखील याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याचे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीला एकत्रित राहता यावे यासाठी त्यांची प्राधान्याने बदली करण्याचा निर्णय सप्टेंबर २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. परंतु नंतर मागील भाजप सरकारने एप्रिल २०१७ मध्ये बदल्यांच्या प्राधान्यक्रमात पुन्हा बदल केला. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीची एका जिल्ह्यात बदली करण्यात अडथळा निर्माण झाला. याचा एकूणच शिक्षकांच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.