वाघळवाडी – निंबूत येथील रमजान सय्यद (वय 70) यांचा सोमवारी (दि. 12) पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. मात्र, नीरा नदीवरील बंधाऱ्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान, या बंधाऱ्याच्या दुतर्फा कठडे नसल्याने पाच वर्षांत बंधाऱ्यावरून पडून 8 जणांना प्राण गमवावा लागला असल्याने नीरावरील हा बंधारा मृत्यूचा सापळा म्हणण्याची वेळ आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सय्यद हे रोज या बंधाऱ्यावरून व्यायामासाठी निंबुत गावामधून पलीकडील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ठिकाणी जात असत, नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे व्यायामानिमित्त या बंधाऱ्यावरून जात असताना अंधारात बंधाऱ्याचा अंदाज न आल्याने ते खाली नदीत पडले, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. नीरा नदीवरील इतर बंधाऱ्याच्या उंचीपेक्षा निंबुतच्या बंधाऱ्यांची उंची कमी असल्याने नदीला पूर आला की नेहमीच या बंधाऱ्यांची दुरवस्था होते.
गेल्या पाच वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे वाहून गेलेले कठडे बसवण्याची तस्दी पाटबंधारे विभागाने अद्यापही घेतली नसल्याने आठ बळी घेणारा बंधारा अशी नवी ओळख ग्रामस्थांनी या बंधाऱ्याला दिली आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन कठडे बसवणार की आणखी बळी जाण्याची वाट पाहत पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून बसणार हे पाहावे लागणार आहे.
या 8 जणांचा बळी
सचिन काकडे, विजय काकडे, सुरेश जगताप, निवृत्ती खंडाळे, गणेश लकडे, रामदास जाधव, एक अज्ञात व आता रमजान सय्यद यांचा मृत्यू झाला आहे.
विनंती करूनही दुर्लक्षच
निंबूत येथील बंधाऱ्यावर कठडे बसवण्याबाबत गावाने वारंवार पाटबंधारे खात्याकडे विनंती करूनही संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. दरम्यान, आता संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन बंधाऱ्यावर कठडे बसवावेत, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन केले जाईल, अशा इशारा ग्रामस्थांनी दिली आहे.