मुंबई : सीएए काय आहे हे काही लोकांना समजूनच घ्यायचे नाही. हा कोणाचीही नागरिकता हिसकावून घेणारा कायदा नाही. कुठेही कोणाला जेलमध्ये धाडले जाणार नाही. हे सगळ्या पक्षांना ठाऊक आहे. तरीही सीएएला विरोध दर्शवला जात आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच झोपलेल्याला जागं करता येते.
पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही, अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. सीएएच्या मुद्द्यावरुन जी भूमिका शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली आहे त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सुनावले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीएए कायदा कोणाचेही नागरिकत्व घेणारा नाही, तर देणारा कायदा आहे. मात्र यावरुन सध्या देशात जाणीवपूर्वक विरोधी वातावरण तयार केले जात आहे. तसेच विरोधक अराजकता पसरवत आहेत. फक्त मुसलमान बांधवच नव्हे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेते तर बंजारा समाजाच्या बांधवांनाही तुमचं नागरिकत्व धोक्यात आहे म्हणून घाबरवत आहेत, अशीही टीका फडणवीस यांनी केली.
मुंबईत काही लोक एकत्र येऊन “शरजील ते सपनोंको हम पुरा करेंगे’ असे म्हणतात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसे काय खपवून घेतात? आसामला तोडण्याचे स्वप्न मुंबईत पूर्ण करायचे असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मला काहीही अपेक्षाच नाही. कारण ते मतांच्या राजकारणासाठी असंच करतात. मात्र यापूर्वी असं काही झाल्यावर चवताळून उठणारी शिवसेना आज शांत का? हा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सीएएला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला की नाही ते मला ठाऊक नाही. त्यांनी पाठिंबा दिला असेल तर त्यांचं स्वागत जरुर करेन. मात्र मी त्यांची मुलाखत पाहिलेली नाही, वाचलेलीही नाही. त्यामुळे मुलाखत पाहिल्यावर किंवा वाचल्यावर मी याबाबतची माझी भूमिका स्पष्ट करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.