दारावरची बेल वाजवून सोनवणे साहेब थोडा वेळ थांबले. तीन मजली घर, दोन लहान तर दोन मोठ्या गाड्या पार्किंगला लावलेल्या होत्या. सकाळचे साडेदहा वाजले असतील, सोनवणे साहेबांना ड्युटीच्या गावी जायचे होते. साहेबांनी पुन्हा बेल वाजवली व वाट पाहात दारातच अंगणाचे निरीक्षण करत होते. किमान आठवडाभर अंगण झाडले नाही. झाडांना पाणी दिलेले नाही व अंगणातील तुळशी वृंदावनातील तुळस सुकलेली होती. कमी जागेत तीन मजले बांधले होते. अंगण फार काही मोठे नव्हते.
एकदाचे दार उघडले आणि शिरसाठ साहेब बाहेर आले त्यांना दारात पाहून म्हणाले, अहो या ना! सॉरी हं थोडा उशीर झाला. अहो रात्रीचे जागरणामुळे पहाटे पहाटे पुन्हा झोप लागली आणि सकाळ कधी झाली कळालेच नाही. तेवढ्यात दोघेही आत आले. हॉलमधील खुर्चीत बसले. सोनवणे साहेबांचे निरीक्षण चालू होते. हॉलमध्ये टीपॉय सोफा, दोन-तीन खुर्च्या, अंगणासारखी काहीशी स्थिती दिवाणखान्याची होती. वरच्या मजल्यावर जायला आतूनच जिना होता. मागील बाजूस स्वयंपाकघर असेल, असे दिसत होते. बरेच दिवस घरातील वस्तूंवर व फरशीला गृहिणीचा हात मिळाला नाही असे दिसत होते. शिरसाठ व सोनवणे यांची ओळख तशी फार जुनी नव्हती अलीकडे निवडणुकीच्या कामामुळे दोघे एकत्र आले होते. एकजण अभियंता तर दुसरा कृषी खात्यातील अधिकारी, पण शासकीय काम, निवडणुकीमुळे गेली मागील दोन महिने दोघे एकत्र दिवसभर नेमून दिलेल्या मतदारसंघात फिरत असत. त्यामुळे झालेली ओळख. दिवसातील चहा, जेवण एकत्र होते. दोघांना मिळून एकत्र गावे मिळालेली होती. त्यामुळे सकाळी सकाळी ठरलेल्या ठिकाणी एकत्र यायचे आणि सोबत जायचे एवढीच त्यांची ओळख, यापूर्वी कधी एकत्र काम नाही आणि घरची विचारपूस नाही, ना गावाचा, कामाचा काहीही संबंध नव्हता. एकमेकांच्या कुटुंबाबद्दल काहीही त्यांना माहिती नव्हती. सोनवणे साहेबांची बदली दुसऱ्या गावात झाली होती. घर मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी होते.
एके ठिकाणी त्यांच्या गाडीत बिघाड झाला आणि त्या गाडीचा पूर्ण खर्च दोघांनी मिळून केला होता. शिरसाठ यांनी सोनवणे साहेबांना फोन करत, अहो गाडीच्या खर्चाचे पैसे मिळाले असून ते घेऊन जा, असा निरोप त्यांना दिला होता. फोनवरूनही त्यांना याबाबत कल्पना दिली होती; परंतु कामाच्या व्यापामुळे, परगावी झालेल्या बदलीमुळे त्यांना येता आले नाही. आज नेमके घरातून निघताना पैशाचे पाकीट विसरले म्हणून ते शिरसाठ यांच्या घरी पत्ता शोधत शोधत आले होते. त्यांनाही पैसे घेऊन पुन्हा स्टॅन्ड गाठावयाचे होते व ड्युटीवर जाणे आवश्यक होते. शिरसाठ साहेबांनी पैसे आणून दिले आणि म्हणाले, अहो, चहा केला असता पण… घरात दूधच नाही आणि घरातच त्यांच्याशिवाय कोणीच नाही असे एव्हाना सोनवणेंच्या लक्षात आले होते. ते म्हणाले “जाऊ द्या हो, मी आता घरूनच चहा घेऊन आलोय,’ सकाळी सकाळी घरी यायचे कारण म्हणजे स्टॅन्ड आल्यावर पाकीट विसरल्याचे लक्षात आले आणि त्यानिमित्ताने तुमच्याकडे यायचा आजचा मुहूर्त लागला.
शिरसाठ साहेब चेष्टामस्करी करणारे, चेहऱ्यावर कायम आनंदी वाटणारे, सुखवस्तू कुटुंबातील समाधानी गृहस्थ असे वाटत होते. एवढ्या मोठ्या घरात ते एकटेच, घरात कोणीही नाही. रात्री उशिरा झोपल्यामुळे झोप पूर्ण न झाल्याचे त्यांच्या डोळ्यात दिसत हाते. सोनवणे साहेबांना जायची घाई होती पण तेही शांत झाले, सोफ्यावर बसता बसता विचारात पडले. ऐवढ्यात शिरासाठ यांनी सांगायला सुरुवात केली… अहो, काय सांगू, या घरात एकटाच असतो. मोठी मुलगी लग्न होऊन सासरी गेली, मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला आहे आणि… एकदम शांत झाले. पुन्हा स्वतःला सावरत म्हणाले, आमची “ही’ पण वर्षापूर्वी मला सोडून गेली, खूप खर्च केला, काळजी घेतली पण आजारच असा होता की त्यातून ती बरी होईल असे वाटत नव्हते आणि तो दिवस उजाडला. प्रत्येकाला जायचे असते, पण तिने असे एकदम जाणे अजूनही खरे वाटत नाही. मीच स्वतःला घरात मुलांना सावरले. मनाची समजूत घातली. असो जाऊ देत… मी काय सकाळी सकाळी तुम्हाला सांगत बसलोय… अहो… आपल्याला कधी यापूर्वी बोलता आले नाही. तुम्हाला किती वेळा घरी या म्हणालो तर तुम्ही आला नाहीत.
शिरसाठ साहेबांनी सोनवणे यांना पैसे दिले आणि सोनवणे निघाले, पण त्यांना जाताना जड वाटत होते. त्यांना हसत हसत गुड मॉर्निंग म्हणत, हॅव अ गुड डे म्हणत त्यांनी निरोप घेतला. घरात असताना त्यांनी घरातील सर्व वस्तू पाहिल्या होत्या. शिरसाठ यांचा स्वभाव एवढे दुःख असतानाही स्वतःला सावरणे व आनंदी राहणे याचाच विचार त्यांच्या मनात येत होता. समाजात अनेक दु:खी माणसे आहेत. आपण उगाचाच आपलं दु:ख कवटाळत बसतो. आयुष्यात जेवढे सुखाचे क्षण असतात तेवढेच दु:खाचेही असतात. बेरीज अधिक वजाबाकी एकूण शून्यच, पण आपण नेहमी वजाबाकीचाच विचार अधिक करतो आणि सुखाच्या क्षणांकडे दुर्लक्ष करतो. समाजात कोणाला आई नाही, कोणाला वडील माहीत नाहीत, कोणाचे आईवडील अचानक सोडून गेले आहेत तर काही दिव्यांग आपल्या दु:खाच्या व दिव्यांगत्वाचा बाऊ न करता आनंदाने जगत असतात तसेच शिरसाठ साहेब दु:खाला विसरून नेहमी हसतमुख दिसायचे.
या सर्वांचे रहस्य त्यांना निघताना लक्षात आले होते. दिवाणखान्यात बरोबर मध्यभागी घड्याळाशेजारी शिरसाठ यांनी सौ. वहिनींचा फोटो लावला होता. फोटोला चंदनाचा हार घातला होता आणि त्या फोटो खाली लिहिले होते…
तुम्ही निश्चिंत राहा, मी आहेच…! या विचारातच त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला. म्हणून म्हणावासे वाटते,
“वणवा तुझ्या हृदयातला असाच, लपवून ठेव तू.
जर चुकून पेटलास, तर आसवांत बुडून जा!
जे भाग्यवंतांना मिळे, ते दु:ख तुझला लाभले,
रडणे तुझे सांगू नको, हसणे तुझे उधळून जा.’
अनिल गुंजाळ