कबीर बोबडे
तक्रार पेटी, हिरकणी कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नाही
नगर – बसस्थानकावर प्रवाशांना सुविधा देण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अपयशी ठरले आहे. सध्या शहरातील तीन बस स्थानकात प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे बेहाल हाल होत असून एसटी प्रशासनाचे प्रवाशांना सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे नगर शहरातील तीन्ही बसस्थानके म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी तीन तिघाडा,काम बिघाडा अशी अवस्था आहे. अस्वच्छता असल्यामुळे परिसरात सुटलेली दुर्गंधी, पिण्याची पाण्याची सोय नाही, असे चित्र सध्या माळीवाडा बस स्थानकावर आहे. तर काहीसे असेच चित्र तारकपूर बस स्थानकासह पुणे बस स्टेशनला बघायला मिळते.
तारकपूर बस स्थानकावर देखील पिण्याच्या पाण्याची सोय नसुन तेथील हिरकणी कक्षाचे फाटक तुटलेले असल्यामुळे शिवाय हिरकणी कक्षात फारश्या सुविधा नसल्यामुळे स्तनपान करण्यासाठी स्तनपान करण्यासाठी तिकडे फिरकत नाहीत. तर पुणे स्टॅन्ड डेपोत स्तनदा मातासाठी हिरकणी कक्षाची सोयच उपलब्ध नाही. त्यामुळे स्तनदा मातांची कुचुंबणा होते. तारकपूर बस स्थानकात मोठे खड्डे तयार झाले आहेत. डांबरीकरण वेळीच न केल्यामुळे बसस्थानक खड्डेमय होऊन स्थानकाची दुरवस्था झाली आहे. याचा एसटीसह प्रवाशांना त्रास होत आहे.
स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ मोठे मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यात बस बसस्थानक अडकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एस टी प्रशासनाच्या दुर्लक्षाने स्थानकाची दुर्दशा झाली आहे. या खड्ड्यांमुळे चालकांनादेखील बस चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय, काही प्रवासी सरळ एस टी फलाटावरच आपली वाहने पार्क करतात, तर काही प्रवासी डेपो परिसरात जिथे जागा मिळेल तिथे वाहने पार्क करतात.
त्यामुळे एस टी वाहतुकीला त्रास होतो. याच तारकपूर एस टी गॅरेजमधील स्वच्छतागृह मोडकळीस येवून पुरती वाट लागलेली आहे. शहरातील माळीवाडा, तारकपूर व पुणे बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. परंतु, या तीनही बसस्थानकांवर प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. शहरातील या तीनही बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी होत असली तरी त्यांना सुविधा देण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अपयशी ठरले आहे असेच म्हणावेसे लागेल. शहरातील तिन्ही एस.टी. स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून, प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.
प्रवाशांना साधे पिण्याचे पाणीदेखील मिळणे मुश्कील झाले आहे. या तीन बस स्थानकापैकी केवळ पुणे स्टॅन्ड डेपोतच प्रवाशांसाठी तक्रार पेटी बसवण्यात आली असून अन्य तारकपूर आणि माळीवाडा बस स्थानकात तक्रार पेटी बसवण्यात आली नाही. पुणे बसस्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था ही अपुरी आहे. शिवाय, जी सुविधा पुरवली गेली, त्याचे बऱ्याच खुर्च्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गाडी डेपोत येईपर्यंत गाडीची वाट पाहत ताटकळत उभे राहवे लागते.
तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोडणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या मालीवाडा बस स्थानक परिसराची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. बस स्थानक परिसरात अतिक्रमणे वाढत आहेत. पारनेर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यांना नगरशी जोडणारे माळीवाडा हे महत्त्वाचे बस स्थानक आहे. या बस स्थानकावरून अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेला सुरक्षा रक्षक बऱ्याचदा जागेवर नसतो. बस स्थानकावरील प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.
कायम वर्दळीचे आणि गजबजलेले स्थानक म्हणून माळीवाडा बसस्थानकाची ओळख आहे. माळीवाडा बस स्थानकच्या दोन्ही प्रवेशदारा जवळ लोखंडी पोल वर आलेत. आणि बस त्या पोलवरून जातांना बस जोरात आढळून प्रवाशांना पाठीचे मणके मोडल्याचा भास होतो. बस स्थानकाच्या या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसते.
बहुतांश वेळा बसस्थाकावरील साफसफाई करणारे कर्मचारी कचरा गोळा करून स्थानकाच्या परिसरातच पेटवून देतात. त्यामुळे गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना धुराचा देखील त्रास हकनाक सहन करावा लागत आहे. तर बरेच जण डेपोच्या परिसरात उघड्यावरच लघु शंका करतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. आगार प्रमुखांनी आगारातील समस्यांकडे दुर्लक्ष न करता, प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नगर शहर हे मध्यवर्ती शहर आहे.याठिकाणी केवळ आपल्याच राज्यातून नव्हे तर इतर राज्यातील बसही येत असतात. त्या प्रवाशांना हे अस्वच्छ दर्शन होते.
पिण्याचे पाणी नाही
शहरांतील तारकपूर बसस्थानकात वॉटर कुलर आहे. मात्र, तो बंद स्वरूपात आहे. शिवाय, मालीवाडा आणि पुणे स्टेशन स्टॅंड बसस्थानकात देखील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, प्रवाशांना बस स्थानक परिसरातील हॉटेल्स मधून बिसलरी चे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.