मंचर-मंचर आणि परिसरातील वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या रुग्णांची लूट करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंचर येथील उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांना नुकतेच दिले आहे.
वरिष्ठ वैद्यकीय पथक स्थापन करुन दोन आठवड्यामध्ये पूर्ण चौकशी करुन अहवाल देऊ.असे लेखी निवेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे सरपंच दत्ता गांजाळे आणि ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला गुरुवारी (दि.26) सायंकाळी तात्पुरती स्थगिती दिली आहे.
या उपोषणाची सांगता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तहसीलदार रमा जोशी, डॉ. एस. एस. ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन करण्यात आली.
मंचर शहरात काही खासगी रूग्मालयातील डॉक्टरांकडून होणाऱ्या डेंग्यू व इतर आजारांच्या उपचारासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी व डॉक्टरांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्यामुळे सरपंच दत्ता गांजाळे व नवनाथ थोरात यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली होती. उ
पोषणाच्या दुसर्या दिवशी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रूग्णालयांवर कारवाई करण्याचे लेखी निवेदन पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. त्यानंतर सरपंच व ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
उपोषणाला स्थगिती दिल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, तहसीलदार रमा जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व शहरातील सर्व डॉक्टर यांची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामस्थ व डॉक्टरांनी आपले म्हणणे मांडले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांच्या संघटनांची बैठक घेऊन रुग्णालयाच्या बाहेर उपचाराची दर निश्चिती केली जाईल, असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्त्रीरोगतज्ञ डॉ. सीमा खिंवसरा, सरपंच दत्ता गांजाळे, बाळासाहेब बाणखेले, राजाराम बाणखेले यांची भाषणे झाली. मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले.