जम्मू: जम्मू काश्मीरातील हायकोर्ट आणि अन्य न्यायालयीन कामकाजावर वकिलांनी टाकलेला बहिष्कार आता मागे घेण्यात आला असून आज चाळीस दिवसांच्या अवधीनंतर हे वकिल आपल्या नियमीत कामकाजावर परतले आहेत. गेल्या 1 नोव्हेंबर पासून वकिलांच्या संघटनांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला होता. या राज्यात कागदपत्रांच्या नोंदणीचे न्यायालयांकडे असलेले अधिकार काढून घेऊन ते महसुल विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच्या विरोधात वकिलांनी हे बहिष्कार आंदोलन सुरू केले होते. या संपामुळे एक महिन्याहून अधिक काळ कोर्टाचे कामकाज ठप्प झाले होते त्यामुळे लोक हैराण झाले होते. त्यांना या निर्णयामुळे आता मोठा दिलासा मिळाला आहे. संपकरी वकिलांवर हायकोर्टाने न्यायालयाच्या बेअदबीच्या नोटीसा जारी करण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे वकिलांना आपला बहिष्कार मागे घ्यावा लागला असल्याचे सांगण्यात येते.