गुवाहाटी : केंद्र सरकारने नागरिकत्व दुरूस्ती कायदा संमत केल्यानंतर आसामात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली होती. राजधानी गुवाहाटीतील जनजीवनही विस्कळीत झाले होते. पण आता तेथील सामान्य जनजीवन सुरळीत झाले आहे.
दिब्रुगड मधील संचारबंदीही आता चौदा तासांसाठी मागे घेण्यात आली. आज बुधवारी सकाळी राज्याच्या कोणत्याही भागातून नव्याने हिंसाचार घडल्याचे वृत्त मिळालेले नाही. बॅंका आणि अन्य व्यावसायिक संस्थांच कामकाज आज सुरळीतपणे सुरू झाले पण शैक्षणिक संस्था मात्र अजून सुरू होऊ शकलेलल्या नाहींत.
प्रशासनाने मोबाईल आणि इंटरनेट सेवा मात्र अजून बंदच ठेवली आहे. ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने या कायद्याच्या विरोधात सामुहिक सत्याग्रह आयोजित केला असून त्याचा आज अखेरचा दिवस होता. आसामात या कायद्यावरून जी हिंसक निदर्शने झाली आहेत त्यात आत्तापर्यंत एकूण पाच जण ठार झाले असून अन्य अनेक जण जखमी झाले आहेत.