वालचंदनगर परिसरातील रब्बी पिकांना फटका
वालचंदनगर (वार्ताहर) – ढगाळ हवामानाचा फटका पीकांना बसण्याची शक्यता असल्याने खरीपातील पीकांवर पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा होणार की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या काही वर्षात पाऊसमानाचे वेळापत्रक बिघडल्यानंतर यावर्षी अवकाळी पाऊस मात्र अधिक काळ लांबला यामुळे गहू, हरभरा तसेच ज्वारीचीही पेरणी लांबली तर हाती आलेल्या पिकांचेही नुकसान झाले. सध्या, शेतात मका, गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांची लागवड झाली आहे.
गहू व हरभरा पिकाला थंड हवामान पोषक असले तरी धुके अशा पिकांना नुकसानकारक ठरू शकते. पहाटे धुके, सकाळी गारवा आणि दुपारी कडक ऊन अशा हवामानाचा परिणाम पिकांवर दिसू लागला आहे. गव्हावर तांबेरा, कांद्यावर करपा, भाजीपाल्यावर केवडा तर फळ बागांनाही रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या काही वर्षापासुन कृषी क्षेत्रावर निसर्गचक्राचीच अवकृपा झालेली आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांनी केला आहे.
अतिवृष्टीमुळे सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी खराब हवामानाचा फटका पिकांना बसू लागला आहे. परिसरात गेल्या चार दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. वातावरणामध्ये थंडी कमी-अधिक प्रमाणात असल्याने याचा परिणाम पिकाच्या वाढीवरही दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी पेन्शन, नुकसानी भरपाई, अनुदान अशा योजनांची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली असली तरी यापैकी कशाचाही लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. त्यातून शेतीमालाला मिळणारे अनिश्चित दर, ऊस शेतीची झालेली वाताहात, कमी दाबाने होणारा वीज पुरवठा, रोगांचा वाढता प्रादूर्भाव यामुळे शेतीचे आर्थिक गणितच कोलमडत असल्याचे बागायदार शेतकरी शंकर जमदाडे यांनी सांगितले.