रवींद्र कदम
नगर – वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे. पावसामुळे रस्त्यांची चाळण झाल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढेले आहे. गेल्या ऑगस्ट ते ऑक्टोंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात तब्बल 63 अपघातांची नोंद झाली असून, या अपघातांत 65 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांचे सर्वाधिक प्रमाण हे उत्तर नगर जिल्ह्यात असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
नुकतीच जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीमध्ये ही आकडेवारी समोर आली. जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाणेहद्दीत होणाऱ्या अपघातांची माहिती मागविण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक अपघात सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले. तीन महिन्यांत 12 अपघातांमध्ये 14 जणांचा बळी गेला, तर बाकी अपघात उत्तरेतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाले आहेत. त्यामध्ये 50 अपघातांत 50 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सातत्याने एकाच ठिकाणी होणारे अपघात थांबविण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील रस्ता अपघातग्रस्त स्थळांची पहाणी नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) वतीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याने अपघात होत आहेत. मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीण्यपूर्ण योजनेतून ब्रिथ ऍनालायझर व स्पीडगन आदी उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही उपकरणे दिली जाणार आहेत. तसेच नगर शहरात औरंगाबाद-नगर रस्त्यावरील विक्रीकर भवनासमोरील वळणावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
अशाच प्रकारे नगर-पुणे महामार्गावरील सुपा येथे सर्वाधिक अपघात झाले आहेत, असे आकडेवारीमध्ये समोर आले आहे. या दोन ठिकाणी रस्त्याचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य झाले नाही. त्यामुळे या दोन ठिकाणी झालेल्या कामांची नाशिक येथील मेरी संस्थेद्वारे महिनाभरात तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तपासणी अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते सुरक्षा समितीला सादर करण्यात येणार आहे.
पोलीस ठाणेनिहाय अपघातांची आकडेवारी
ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सुपा – 12 अपघात 14 जणांचा मृत्यू, राहुरी – 10 अपघात 11 मृत्यू, नेवासा – 10 अपघात 10 मृत्यू, संगमनेर- 11 अपघात 9 मृत्यू, आश्वी – 7 अपघात 8 मृत्यू, कोपरगाव शहर- 7 अपघात 7 मृत्यू, शिर्डी – 6 अपघात 6 जणांचा मृत्यू झाले आहेत.