शंकर दुपारगुडे
कोपरगाव – विधानसभा निवडणुकीत माझा झालेला पराभव म्हणजे राजकीय कटकारस्थानातून माझा बळी गेला आहे. अनेक विरोधक छुप्या पद्धतीने एकत्र येवून माझ्या विरोधात षडयंत्र रचले. मी एक महिला असूनही त्यांच्या विरोधामध्ये खुप लढले. माझ्या विरोधात अपप्रचार करून कुटील डाव रचल्याने माझा राजकीय बळी गेला, अशी खंत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलताना व्यक्त केली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप-सेना महायुतीचे उमेदवार म्हणून स्नेहलता कोल्हे दुसऱ्यांना आमदार होण्याचे नशीब अजमावत होत्या, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांनी त्यांचा 822 मताने पराभव करून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवली. निसरडा झालेला पराभव स्नेहलता कोल्हे यांना जिव्हारी लागला. त्यांच्या झालेल्या पराभव संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना त्या पुढे म्हणाल्या की, मी जितके काम पाच वर्षात केले. तितके काम कोणीच करू शकणार नाही.
आता विकास केला तरच पुढच्या पिढीला भविष्य आहे. ही उदात्त भावना मनात ठेवून ंपूर्ण लक्ष विकास कामावर केंद्रित केले होते. कोपरगावच्या इतिहासात सर्वात जास्त विकास निधी मिळवून दिला. शहरातील हद्दवाढीचा प्रश्न, विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. अतिक्रमणधारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले. छोट्या मोठा अनेक योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्य केली.
शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने निळवंडेचे स्वच्छ पाणी कोपरगाव शहराला कायमस्वरूपी मिळावे यासाठी प्रयत्न केले. या पाण्यासाठी माझी आमदारकी पणाला लावली. निळवंडेचे पाणी कोपरगावला मिळविण्याच्या प्रयत्नात प्रसंगी सर्वांचा विरोध पत्करला. निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या एका थेंबालाही धक्का न लावता कोपरगावला पाणी येणार होते. हे माझ्यासह स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तरीही विरोधकांनी काही लोकांना हाताशी धरुन माझ्या विरूध्द न्यायालयात खोटे गुन्हे दाखल केले. जनतेत दिशाभूल केले.
कुटील स्वार्थी राजकारणासाठी माझ्यावर खोटे आरोप करून विरोधकांनी बुध्दीभेद करीत होते. मात्र मी हे जनतेला पटवून सांगण्यात कमी पडले. विरोधकांनी एकत्र येवून एकटीवर सामुदायीक विषारी टिका करुन केवळ माझा पराभव करण्याचा चंग बांधला होता. त्यांना मतदारसंघातील विकासापेक्षा माझा पराभूत करणे, हाच एक राजकीय डाव होता. त्या कामासाठी, विरोधकांनी राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, स्वहीतासाठी व्यक्ती द्वेषाने काम करणारा पत्रकारांना हाताशी धरून कुटील डाव रचला.
माझा पराभव करणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. माझा पराभव करण्यासाठी सोशल मीडियावर दररोज अपप्रचार केला जात होता. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यात माझा पराभव झाल्याबरोबर विरोधकांनी सोशल मीडियावरची टीका-टिप्पणी बंद केली. पराभव झाल्यानंतर शहरातील सर्व प्रश्न मार्गी लागले की काय असा प्रश्न मला पडला आहे. समस्येचा पुळका असणारे सोशल मीडियावर 24 तास टीका करणारे शांत झाले, असे त्या म्हणाल्या.
पराभूत झाले असले तरी माझी सामाजिक बांधिलकी संपली नाही, ती कायम आहे. माझे हे लोकसेवेचे व्रत चालू ठेवणार मी थांबणार नाही आणि मी थकणार नाही.
मी कधीच समाज भेद, जाती- पातीचे राजकारण केले नाही. विकास कामावर लक्ष केंद्रित केले होते. माझ्या कामाची सुरुवात आमदार होण्यापूर्वी गोरगरीब महिला बचत गटापासून झाल्यामुळे मी आमदारकीच्या काळात जनतेचे पडेल ते काम केले. शहराच्या 42 कोटी पाणीपुरवठा योजनेसाठी निधी कमी पडला, तेव्हा तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी सात कोटी रुपयांची मागणी करताच मुख्यमंत्र्यांना भेटून त्वरित निधी मिळवून दिल्यानंतर योजनेच्या कामाला गती मिळाली.
निळवंडेचे पाणी कोपरगावला मिळू नये, म्हणुन जिल्हा परिषद निवडणुक दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी पोहेगावच्या सभेत निळवंडेचे पाणी कोपरगावला जावू देणार नाही, अशी भूमिका मांडली होती तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी मिळू नये म्हणुन न्यायालयात खेचले. संगमनेरचे बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कारखान्याच्या वतीने न्यायालयात केस टाकून विरोध केला. नगराध्यक्ष वहाडणे यांनी तर कोपरगावकरांची दिशाभुलच केली. कोपरगावच्या पाण्याला विरोध करणाऱ्यांना मतदान करून जनतेने विजयी केले अशी खंत व्यक्त करून त्या म्हणाल्या, मी कोपरगावच्या पाण्याला अथवा तळ्यांच्या कामाला कधीच विरोध केला नाही.
उलट मदतच केली. शहराच्या पाण्यासाठी प्रयत्न केला हा माझा गुन्हा आहे का? असा सवाल स्नेहलता कोल्हे यांनी केला. जर मी कोपरगावच्या पाण्याला विरोध करणार असते तर आमदार होण्यापूर्वी पासून लोकसहभागातून व माझ्या स्वतःच्या खर्चातून साठवण तलावाचा गाळ काढला. पाण्याची साठवण क्षमता वाढवली. मला विरोध करायचा असता तर आमदार झाल्यानंतर कायमस्वरूपी पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न केलाच नसता. मी एक महिला आहे आणि महिलांना पाण्यासाठी कसा त्रास होतो, याची जाणीव आहे.
म्हणूनच कायमस्वरूपी निळवंडे पाणी कोपरगावला मिळण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न होता. कोपरगावकरांना दुसरा पाण्याचा पर्याय उपलब्ध करत होते. दोन ठिकाणच्या पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर भविष्यात कधीच पाण्याचा प्रश्न कोपरगावला भेडसावणार नाही, ही प्रामाणिक इच्छा माझ्या मनात आहे. विरोधकांकडे दुर्लक्ष करतात मतदारसंघाच्या विकासकामासाठी लक्ष केंद्रित केले.
पाच वर्षात रात्रंदिवस मेहनत घेऊन मंत्रालयाच्या वाऱ्या करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न केला. जनहीतासाठी विकास कामे केले, हा माझा दोष आहे का? निळवंडेच्या पाण्यासाठी आमदारकी घालवली. हा माझा दोष आहे का? मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मिळवून दिला हा माझा दोष आहे का? संपूर्ण मतदारसंघाच्या विकास कामाच्या व्यापात व्यक्तिगत गाठीभेटी देण्यास मला वेळ मिळाला नाही, हा माझा दोष आहे का? मी एक महिला असूनही विकास कामात आडकाठी आणणाऱ्यांच्या विरोधात टोकाचा संघर्ष केला, तो माझा गुन्हा झाला का? शहराच्या पाणीप्रश्नासाठी लोणी, संगमनेरच्या नेत्यांसह, कार्यकर्ते, पत्रकारांनी कोपरगावला पाणी मिळवणे म्हणून विरोध केला यांचा विरोध मी अंगावर घेतला हे चुकले का?
जनतेचे विकास कामे करायचे सोडून विरोधकांसारखे सतत सोशल मीडियावर खेळत बसण्याऐवजी मतदारसंघाला निधी मिळवून विकासाचे कामे करण्याची धडपड केली हा माझा दोष आहे का? मतदारसंघासाठी जास्त विकास काम करणारा लोकप्रतिनिधी मान्य नाही का? अनेक वर्षांनूवर्षे रखडलेले प्रलंबित प्रश्न सोडवले, हा माझा गुन्हा आहे का? असे अनेक प्रश्न मला पडत आहेत. म्हणुन माझ्या पराभवाचे प्रश्न मी स्वत:ला विचारले की मी कुठे चुकले? तर मला असे वाटले, जास्त विकास काम करूनही मी राजकीय बळी ठरले असेही त्या म्हणाल्या.
पराभवाचा मी विचार केल्यानंतर माझ्या अंतरमनातून उत्तर आलं की सर्वसामान्य जनतेने आपल्याला न्याय दिला, परंतु कुटील राजकीय कटातून आपला घात झाला. जनतेतून झालेल्या पराभवापेक्षा राजकीय कटकारस्थातून झाल्याने माझ्या जिव्हारी लागला आहे. माझी सामाजिक बांधिलकी जपत मी जनसेवा करीत राहणार परंतू प्रामाणिकपणे विकास काम करणाऱ्यांच्या वाट्याला असा निकाल येत असेल तर, माझ्यासारख्या विकास काम करणाऱ्याचा राजकीय कटकारस्थानातून बळी घेतला असंच मी म्हणेन असे त्या म्हणाल्या.
मेहुण्याच्या भल्यासह पदांसाठी कोपरगावचा वापर
शेजारच्या तालुक्यातील नेत्यांनी कधीच कोपरगावचे भले पाहिले नाही. कोपरगावच्या प्रश्नासाठी कधी पाठीमागे उभे राहिले नाहीत. त्यांनी केवळ मेव्हण्याच्या भल्यासाठी परिवाराला पद मिळवण्यासाठी कोपरगावचा वापर केला. निळवंडीतून येणाऱ्या कोपरगावच्या पाण्याला उलट त्यांनी विरोध करून पाप केले. निळवंडे पाणी कोपरगावला आणून जनतेची तहान भागवणे हे पुण्याचे काम आहे हे काम मी पूर्ण करणार. विकास काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा बळी घेवून कटकारस्थान करणाऱ्या धूर्त लोकांनी जनतेच्या विकासापेक्षा स्वत:चे कुटिल डाव पेच खेळत माझ्या पराभवात धन्यता मानत असतील तर तालुक्याचे न भरून येणारे नुकसान त्यांनी केले.
सर्वसामान्य जनतेचा पराभव
मतदारसंघातील विजेचा प्रश्न सोडविला, शहरातील खुले नाट्यगृह करण्यासाठी 2 कोटी मिळवून दिले. रस्ते, पाणी, नविन प्रशासकिय इमारती, नविन बसस्थानक, बस थांबे, सभा मंडप, पालीका इमारत, अग्निशामक दल इमारत, जलसंधारणाचे कामे अशा अनेक कामांची मालिका सुरु करूनही माझा पराभव झाला. हा माझा एकटीचा पराभव नसुन सर्वसामान्य जनतेच्या विकास कामाचा पराभव आहे.