शिवेंद्रसिंहराजेंच्या निवेदनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
सातारा – पुणे- सातारा महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश रस्ते आणि भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरीयांनी दिले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली असता गडकरी यांनी त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना हे आदेश दिले.
सातारा- पुणे महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. “टोलविरोधी सातारी जनता’ या सामाजिक समूहाच्या “आधी रस्त्यांची दुरुस्ती, मग टोल वसुली’ या भूमिकेला पाठिंबा देतानाच शिवेंद्रसिंहराजे यांनी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दहा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार त्यांनी गडकरी यांची पुण्यात भेट घेऊन महामार्ग दुरुस्ती आणि अत्यावश्यक सोयीसुविधा पुरवण्याबाबतचे निवेदन त्यांना दिले.
तसेच यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी गडकरी यांच्याकडे केली आणि लगेचच गडकरी यांनी दूरध्वनीवरुन संबंधित अधिकाऱ्यांना कानपिचक्या देत महामार्ग दुरुस्तीचे आदेश दिले. या महामार्गाची दरवर्षी खड्डयांमुळे चाळण होते. मोठ्या खडड्यांमुळे दररोज छोटे- मोठे अपघात होतात. अनेकांना प्राण गमवावा लागतो, अनेक कायमचे जायबंदी होतात.
लोकांच्या जीवाशी खेळ सुरु असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डोळ्यावर पट्टी बांधून बघ्याची भूमिका घेते. प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदारास तर लोकांच्या जीवाचे काहीही देणेघेणे राहिले नाही. दळणवळणासाठी दर्जेदार महामार्ग असावा, वाहनचालक आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टोलवसुली आहे, का ठेकेदाराचे इमले उभे करण्यासाठी टोल वसुली आहे, हेच कळेनासे झाले आहे.
जनतेमधून संतापाची लाट उभी राहिली की तेवढ्यापुरती मलमपट्टी होते. कुंभकर्णी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराला वठणीवर आणणे आवश्यक आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी गडकरींची भेट घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन टोलविरोधी समूहाला दिले होते. त्यानुसार शिवेंद्रसिंहराजे यांनी गडकरी यांची भेट घेऊन महामार्गाच्या दुरवस्थेची आणि त्यामुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानीची कल्पना दिली.
वाहन चालक आणि प्रवासांच्या समस्यांबाबत तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या मागणीनुसार ना. गडकरी यांनी लगेचच महामार्ग प्राधिकरणाच्या संबिंधत अधिकाऱ्यांना फोन केला. महामार्गाची झालेली दयनीय अवस्था आणि अधिकारी व ठेकेदाराचे दुर्लक्ष याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच गडकरी यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.