पुणे : सध्या राज्यात अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. या मध्ये कांदा आणि लसूण यांचाही समावेश असल्याने बाजारातील अवाक घटली आहे. त्यामुळे कांदा आणि लसणाचे भाव चांगलेच वाढले आहेत.
राज्यातील आणि देशातील कांदा उत्पादित भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा भिजून त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर नवीन कांद्याची होणारी लागवड देखील धोक्यात आली आहे. सद्यःस्थितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे जुन्या कांद्याचा साठा शिल्लक आहे. तोही काही प्रमाणातच आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.
आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने बाजारात कांदा आणि लसूण यांचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याने दराचा आलेख वाढत आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केट मध्ये कांद्याच्या फक्त 60 गाड्याची आवक झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कांदा 38 रुपया पर्यंत होता. आता तोच कांदा 45 रुपये किलोने घाऊक बाजारात विकला जातोय. तर हाच कांदा किरकोळ बाजारात 60ते 70 रुपयांनी विकला जातोय. तसेच लसूण देखील 400 रुपये केली वर पोहचला आहे. परतीचा पाऊस अजून पडत असल्याने कांदा खराब होत आहे. यामुळे कांदयाचे दर येत्या काही दिवस चढेच राहणार असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील साठवून ठेवलेला कांदा जवळपास संपत आला आहे. तसेच आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात देखील नवीन कांद्याची तुरळक आवक होत आहे. त्यामुळे या राज्यांमधून महाराष्ट्रातील जुन्या दर्जेदार कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे सगळीकडूनच मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसघशीत वाढ होत आहे.