मुंबई: महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा पेच कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (सोमवार) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
पेचाच्या काळातही भाजपवर निशाणा साधताना शिवसेना हात आखडता घेताना दिसत नाही. आता शिवसेनेने महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत थेट शहा यांना लक्ष्य करताना त्यांचे मौन रहस्यमय असल्याचे म्हटले. शहा यांच्यावरील टीकेच्या दिवशीच त्यांच्या भेटीसाठी फडणवीस जाणार असल्याची माहिती समोर आली.
त्यामुळे शहा आणि फडणवीस यांच्या भेटीचे महत्व आणखीच वाढले आहे. अर्थात, ती भेट अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीबाबत चर्चा करण्यासाठी असल्याचे भाजपच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून सहाय्य उपलब्ध करण्यावर त्या भेटीत चर्चा होणार असल्याचे सुत्रांनी म्हटले. पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी 10 हजार कोटी रूपये उपलब्ध करण्याची घोषणा शनिवारी महाराष्ट्र सरकारने केली. मात्र, ती मदत अपुरी असल्याची टीका विरोधकांबरोबरच शिवसेनेनेही केली आहे.