शरद पवारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
नाशिक: परतीच्या पावसाने नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षमण्यांना तडा जाऊन ते गळून पडले आहेत. आज इगतपुरीतील जाधववाडी गावातील रामचंद्र चुंबळे यांच्या बागेला भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकसानाची पाहणी केली.
“आमच्या हातचं पीक गेलंय, खूप नुकसान झालंय, जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही,” असं या शेतकऱ्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले. शरद पवार यांनी आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना भेट दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सतत पाऊस होत असल्याने शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोपे, मेथी, धना, शेपू, कोबी, फ्लॉवर, मका, भेंडी, गवार व इतर पिके सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन, ज्वारी, बाजरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.