उन्हाळ्यात पाणी कपात टळणार : पवना धरणात गतवर्षीपेक्षा 11.50 टक्के अधिक साठा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पहिल्यांदाच ऑक्टोबर अखेरपर्यंत 100 टक्के इतका पाणी साठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणी साठा असून गतवर्षीपेक्षा यावेळी 11.50 टक्के पाणीसाठा अधिक आहे. यामुळे शहरवासियांना उन्हाळ्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा नियमित केला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो. मागीलवर्षी पाणलोट क्षेत्रात 3367 मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. यावेळी चार हजार 20 मिली मीटर पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला आहे. मागील वर्षीपेक्षा 700 मिली मीटर पाऊस यावेळी जास्त झाला आहे. मागीलवर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे शहरवासियांना दिवाळीपासूनच पाणीकपातीला सामोरे जावे लागले होते. सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले होते. त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता असल्याने दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली होती. ही पाणीकपात 9 ऑगस्टपासून रद्द करत दररोज पाणीपुरवठा सुरु केला होता. परंतु, पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने पुन्हा 18 ऑगस्टपासून आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीकपात लागू केली आहे. धरणात 100 टक्के पाणीसाठा असूनही विभागनिहाय पाणीकपात कायम आहे.
पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गडवाल म्हणाले, धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. पहिल्यांदाच ऑक्टोबरअखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरु राहिला. मागीलवर्षी ऑगस्टअखेरलाच पाऊस संपला होता. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला नाही. परतीचा पाऊस देखील पडला नव्हता. यावेळी ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालला. ऑक्टोबरच्या अगोदर पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणात साठवून ठेवता येत नाही.
700 मिमी अधिक पाऊस
पाणी साठवून ठेवण्याची 15 ऑगस्टपर्यंत मर्यादा ठरलेली असते. 15 ऑगस्टनंतर धरणात 100 टक्के पाणीसाठा केला जातो. 15 ऑगस्टनंतर झालेल्या पावसाचा उपयोग होत नाही. धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागतो असे गडवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, यावेळी 15 ऑगस्टनंतर 15 ऑक्टोबरपर्यंत पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या पाण्याचे साठवण करता आले. मागीलवर्षी पाणलोट क्षेत्रात 3367 मिली मीटर पाऊस झाला होता. यावेळी चार हजार 20 मिली मीटर पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला आहे. 700 मिली मीटर पाऊस यावेळी जास्त झाला असून हे पाणी साठवता आले. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. धरणात मुबलक पाणी आहे. तरीही नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन गडवाल यांनी केले.
आढावा बैठक घेणार- महापौर
पाणीपुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित आहे, मात्र विभागनिहाय आठ दिवसातून शहरातील एका भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. यामुळे नागरिकांकडून पाणी साठवून ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी ते फेकून दिले जाते. यामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले असून हे होऊ नये, यासाठी संपूर्ण आठवडाभर व्यवस्थित पाणीपुरवठा केला जावा, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. यासाठी आढावा बैठक घेणार असल्याचे महापौर राहुल जाधव म्हणाले.
पवना धरणात आजमितीला 100 टक्के पाणी साठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणी साठा आहे. महापालिकेने पाणी कपात केली नाही. केवळ विभागनिहाय आठ दिवसातून एका भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. आज देखील 480 एमएलडी पाणी उचलले जाते. सध्या नदीपात्रातूनच हे पाणी उचलण्यात येत आहे.
– मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महापालिका.