पिंपरी मतदारसंघातील भाजपासह रिपाईंनेही विरोधकांना रसद पुरविल्याची चर्चा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेकडे असलेली पिंपरी विधानसभेतील एकमेव जागा गमाविल्यामुळे महायुतीमध्ये आता संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीच राष्ट्रवादीला रसद पुरविल्यामुळे चाबुकस्वार यांचा पराभव झाल्याची चर्चा रंगली असून रिपाईंनेही साथ न दिल्याचा आरोप होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी सुमारे 19 हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला. अनपेक्षित पराभव झाल्यामुळे महायुतीमध्ये आता संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील तीन जागांपैकी भोसरी आणि चिंचवड भाजपाकडे तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. चिंचवड आणि भोसरीत कमळ फुलले मात्र पिंपरीमध्ये शिवसेनेचे उमेदवार ऍड. गौतम चाबुकस्वार यांचा पराभव झाल्यामुळे युतीमध्ये आता संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. गतवेळी (2014) झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे लढूनही शिवसेनेनेही जागा काबिज केली होती. त्यावेळी जागावाटपात हा मतदारसंघ रिपाईकडे होता. तर राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी ही निवडणूक लढविली होती. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या तिरंगी लढतीत चाबुकस्वार यांनी विजयश्री खेचून आणली होती. यावेळी शिवसेना, भाजपा आणि रिपाईं हे तीन पक्ष एकत्र असतानाही शिवसेनेचे उमेदवार चाबुकस्वार यांचा पराभव झाला.
पिंपरी मतदारसंघात शिवसेना आणि भाजपासोबतच रिपाईची ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर चाबुकस्वार सहज विजयी होतील, असा कयास सर्वांचाच होता. मात्र राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी सुमारे 19 हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला. अनपेक्षित पराभव झाल्यामुळे महायुतीमध्ये आता संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. भोसरी आणि चिंचवडमध्ये शिवसैनिकांनी भाजपाचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केला मात्र पिंपरीत भाजपाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित साथ न दिल्यामुळे पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघात संपूर्ण भाजपाचे नेते काम करत होते. या मतदारसंघात लोकसभेला 42 हजारांच्या आसपास मताधिक्य होते. हे मताधिक्य कमी करून बनसोडे यांनी 19 हजारांनी विजय मिळविला. त्यामुळे भाजपाची यंत्रणा पिंपरीत कामालाच न लागल्याचा आरोप होत आहे. युतीचा धर्म केवळ शिवसेनेने पाळला महायुतीमधील इतर घटकांनी साथ न दिल्यामुळेच चाबुकस्वार पराभूत झाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचा शहरातील जनधार घटतोय
लोकसभा निवडणुकीपासून शहरातील शिवसेनेचा जनाधार कमी होत चालला आहे. शहरातील तीनही मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र शिवसेनेतील अंतर्गत कलह, शहरात सर्वमान्य नसलेले नेतृत्त्व आणि निवडणुकीपुरता जनतेत मिसळणारा पक्ष यामुळे शिवसेनेचा जनाधार घटू लागला आहे. सर्वमान्य नेता न दिल्यास तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने ठोस भूमिका न घेतल्यास त्याचा फटका येत्या महापालिका निवडणुकीत या पक्षाला बसू शकतो, असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्तहोत आहे.