जानेवारीतली मकरसंक्रात पार पडते, शिमगा होतो. गावोगावी पेटणाऱ्या होळ्या वातावरणातला गारठा हुसकून लावतात. दिवस मोठा होतो. रात्र छोटी होते. घड्याळाचे काटे संथ झाल्याप्रमाणे दिवस सरत नाही. मग एक महिना सरणं किती कठीण होतं असेल? दिनदर्शिकेचं पान उलटणं किती जड जात असेल? त्याहीपेक्षा महिन्यांमागून महिने उलटणे किती अवघड होत असेल? मार्च नंतर गारठा काढता पाय घेतो. ऊन तापू लागतं. मोकळ्या माळावर मृगजळ दिसू लागतं. वावटळी उठू लागतात. उष्ण हवा नाकपुड्यांना स्पर्श करते तेव्हा श्वास घेण्याची इच्छा सुद्धा मरून जाते. तापत्या उन्हात वसंत येतो. झाडांना नवी पालवी देतो. वैशाख वणव्याच्या, उन्हाच्या झळा सोसत, घामाचे ओघळ पुसत, माठातलं पाणी पीत, पंख्याची हवा घेत, एसीच्या आडोशाने माणूस कसेतरी दिवस ढकलत असतो आणि आभाळात आषाढाचे ढग दाटून येतात. मृगाच्या सरी बरसू लागतात. झाडं वेली धुवून-धावून स्वच्छ केली जातात. मातीला हिरवं स्वप्न पडू लागतं. मातीच्या कुशीतून हिरवे अंकुर आभाळाच्या दिशेने झेपावतात. काळ्या मातीवरची हिरवीगर्द माया होतात. आषाढ सरता सरता पुढे येणाऱ्या सणांची झुंबड दिसू लागते. मनाला आनंदाचे पाझर फुटतात. श्रावण येतो. पंचमी येते. राखीपोर्णिमा साजरी होते. गौरी गणपती येतात. पाठोपाठ दसरा येतो आणि दसरा सरतानाच, आता वीस एकवीस दिवसात दिवाळी येणार म्हणत उलटी गणती सुरू होते. सतरा… पंधरा… तीन… दोन… झालं! उद्या दिवाळी.
दसऱ्यानंतर दिवाळी एकवीस दिवसांनीच का येते? त्याची सुद्धा एक विश्वास ठेवावा अशी आख्यायिका आहे. चौदा वर्षांचा वनवास पत्करून श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईने अयोध्या सोडली. जंगलात वास्तव्य केलं. कंदमुळं खाऊन फलाहार घेऊन भूक भागविली. पर्णकुटीत वास्तव्य केलं. राम लक्ष्मण कुटीत नाहीत हे पाहून रावण साधूचं रूप घेऊन तिथे आला. सीतेला पळवून नेलं. श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्याचं ठरवलं. ऋषीमुनींच्या आग्रहावरून घटस्थापनेदिवशी रणचंडिकेची आराधना सुरू केली. “विजयी भव’ असा तिचा आशीर्वाद प्राप्त केला. रावणाचं पारिपत्य करून विजय प्राप्त केला. तो दिवस आपण ‘दसरा’ अथवा ‘विजयादशमी’ म्हणून साजरा करतो. रावणाचा वध झाला. एक अवतारकार्य पूर्ण झालं. चौदा वर्षांचा वनवास संपला होता. अयोध्येला परतण्याची वेळ झाली होती. सीतामाई आणि लक्ष्मणासह श्रीरामांनी लंकेतून प्रवास सुरू केला. 21 दिवसांच्या अथक प्रवासानंतर श्रीराम अयोध्येत परतले. त्यामुळेच दसऱ्यानंतर दिवाळी बरोबर 21 दिवसांनी येते. अयोध्येत परतलेल्या आपल्या राज्याच्या स्वागतासाठी रयतेने तुपाचे दिवे लावून आनंद व्यक्त केला. त्यालाच पुढे दीपावली अशी ओळख मिळाली.
मकरसंक्रात, होळी, धुळवड, रंगपंचमी, गुढीपाडवा, नागपंचमी, वटपौर्णिमा, राखीपौर्णिमा, गणपती, गौरी, नवरात्र, दसरा, दिवाळी असे अनेक सण माणसाचं आयुष्य समृद्ध करतात. भोवताल चैतन्याने व्यापून टाकतात. सण येणार म्हटलं तरी मनाला उत्साहाचे धुमारे फुटतात. या प्रत्येक सणाचा आणि काही गोष्टीचा एकमेकांशी दृढ संबंध आहे. मकरसंक्रांतीला “तिळगुळ’ दिलं घेतलं जातं आणि “तिळगुळ घ्या, गोड बोला’ असं म्हणत, सारे रागलोभ दूर सारत एकमेकांशी गोड बोलण्याचा, कटुता विसरण्याचा अलिखित करार होतो. होळी येते. ठिकठिकाणी होळी पेटते. दुर्गुण तिच्या अधीन केले जातात. धुळवड आणि रंगपंचमीतला फरक मात्र पुसट होत चालला आहे. रंगपंचमीपेक्षा होळीनंतर दुसऱ्या दिवशी येणारी धुळवड जात भाव खाऊन जाते. रंगपंचमीचे रंग लेवून घेते. धुळवड स्वतःच अस्तित्व विसरून रंगपंचमी होते. गुढीपाडव्याला गुढी उभारतानाही मनाला आनंदची भरती येते. आभाळाकडे धाव घेणाऱ्या गुढीप्रमाणे माणसाच्या इच्छा, अपेक्षा सुद्धा आभाळाकडे धाव घेतात. गुढीपाडवा पार पडला की मग मात्र आयुष्य कंटाळवाणं वाटू लागतं. खाणं पिणं, ऑफिस आणि झोपणं एवढंच आयुष्य उरतं. एक रुटीन फक्त. दिवस उगवत असतो. रात्र मावळत असते आणि मध्ये नित्याच्या घटना घडत असतात. वेगळेपण नसलेल्या.
पण श्रावण येतो. पंचमी येते. नटून थाटून महिला नागोबाची पूजा करायला वारूळ गाठतात. वटपौर्णिमेला याच महिला साजशृंगार करून वडाची मनधरणी करतात. “सात जन्म हाच नवरा मिळावा’ म्हणून वडाला साकडं घालतात. राखीपोर्णिमेला बहिणीची राखी बांधून घ्यायला भावांची मनगटं आतुर होतात. गणपतीचं आगमन होतं. घराघरातून आरत्यांचे सूर ऐकू येतात. गौरी बसतात. त्यांची आरास. त्यांची जेवण, विसर्जन सगळाच मोठा सरंजाम असतो. नवरात्रीला नऊ दिवस देवीचा उत्सव. घराघरातले नऊ दिवसांचे उपवास, फराळ, दांडिया, घरात बसलेले घट, त्यात उगवून येणारं धनधान्य. नऊ दिवस कसे जातात तेही कळत नाही. दसऱ्याला घट उठतात. घाटातलं उगवून आलेलं धान्य टोपीत खोचून देवदर्शनाला जाणारे पुरुष दिसतात. सीमोल्लंघन नावापुरतं उरलं असलं तरी बाजारातून आणलेली आपट्याची पानं एकमेकांना देता घेता “सोनं घ्या. सोन्यासारखं राहा’ असं म्हणत एकमेकांच्या गळाभेटी घेतल्या जातात. दसरा पार पडतो आणि दिवाळीची चाहूल लागते.
दिवाळी येते. नव्या कपड्यांची खरेदी होते. खास दिवाळीचा किराणा भरला जातो. महिलांची लगबग सुरू होते. घराघरातून चिवड्या चकल्यांचे, करंज्या, अनारस्यांचे, लाडवांचे दरवळ आसमंतात मिसळतात. सगळं वातावरण खमंग होऊन जातं. उटणं लावून स्नान होतं. ओवाळणं होतं. कपाळावर गंध लागतो. फराळाच्या ताटल्या पुढ्यात मांडल्या जातात. मिटक्या मारत फराळाचा आस्वाद घेतला जातो. लक्ष्मीपूजन होतं. पाडवा पार पडतो. भाऊबीज उरकते. पण तरीही दिवाळीचा सण संपत नाही. तुळशीची लग्न सुरू होतात. पंधरा दिवस तिथी असतात. आज या घरात तर उद्या त्या घरात असे दिवस तुळशी विवाहाच्या धामधुमीत पार पडतात. दिवाळी सरता सरता वर्षे सरते आणि नव्या वर्षातल्या मकरसंक्रांतीची चाहूल लागते. दिवाळीत खर्च थोडाफार जास्त होतो. म्हणून दिवाळं काढणारा सण म्हणजे दिवाळी अथवा दिवाळसण असेही दिवाळीला म्हटले जाते. पण दिवाळी माणसाच्या आयुष्याला प्रकाशाचं दान देते. आनंदाचं उधाण देते, चैतन्याचं अंगण देते. म्हणूनच प्रत्येक सणाचं आपलं आपलं वेगळेपण असतानाही “सणात सण दिवाळसण’ असे म्हणणेच योग्य ठरते.
विजय शेंडगे