कळंब- निमसाखर मार्गावर अलिखित फतवा : ठेकेदारांकडून रस्त्याची वाट
निमसाखर- राज्य मार्ग म्हणून ओळख असलेल्या कळंब ते निमसाखरदरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत रस्त्यावर कोणींही या, अन् रस्ता खोदून जा! अशी अवस्था झाली आहे. ठेकेदारांची मनमानी आणि शेतकऱ्यांचा आतातायीपणा आदी कारणांमुळे रस्त्याची वाट लागली आहे. त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा धाक उरला नाही. हेच विदारक चित्र दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कारवाईचे अस्त्र उगारले जात नसल्याचा आरोप प्रवासी आणि स्थानिक नागरिकांतून होत आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना बीकेबीएन रस्ता सोयीचा आहे. हा रस्ता रात्रदिवस वर्दळीचा म्हणून ओळखला जातो. सध्या कळंब ते निमसाखर भागात जागोजागी मोठे खड्डे व चढ उतार तयार झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी एकेरी वाहतूकच करावी लागत आहे. अनेक ठिकाणी साईड पट्टयांवरच केबलसाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
निमसाखरजवळील ओढ्यालगतच केबलसाठी भलीमोठी चर खोदल्याने चारीचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. चारचाकी वाहनांची खालील बाजू जमिनीलगत आदळत आहे. रस्ते खोदकाम करण्यासाठी अनेक बाबींचा पाठपुरावा करावा लागतो. रस्ते खोदाईमध्ये सध्या केबल ठेकेदार, परिसरातील शेतकरी यांनी हा नियम पायदळी तुडविल्याची चर्चा जोर धरत आहे. वास्तविक खोदाई करताना प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. काम झाल्यानंतर रस्ता सुस्थितीत करून देणे गरजेचे आहे. मात्र हा नियम धाब्यावर बसविला जात आहे. येत्या पाच दिवसांत रस्त्यावरील चाऱ्या बुजवून रस्ता सुस्थितीत न केल्यास निमसाखरमधील तरुण व नागरिक स्वतः श्रमदान करून हे खड्डे व चाऱ्या बुजवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार आहेत.