यंदाच्या वर्षात पुरस्कारांचा चौकार; स्वच्छता अभियानातही अग्रभागी
कराड – स्मार्ट ग्राम म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कराड तालुक्यातील बनवडी गावाची दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या वर्षात बनवडी गावाने तालुका, जिल्हा व देश पातळीवरील एकूण चार पुरस्कार मिळवले आहेत.
बनवडी हे गाव कराड शहराच्या जवळ आहे. शहरापाठोपाठ बनवडीनेही विविध योजना यशस्वीपणे राबवत गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. ग्रामपंचायतीने सुरुवातीला चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना राबविली. ही योजना आजही व्यवस्थित सुरू आहे. त्यानंतर हागणदारीमुक्त गाव स्पर्धेत सहभागी होत ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. सध्या गावात सोलर व्हॅट प्रोजेक्ट, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत.
बनवडी ग्रामपंचायतीचा आदर्श घेत तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनीही घनकचरा व्यवस्थापन सुरू केले आहे. बनवडी गाव घोषित विमा ग्राम म्हणूनही करण्यात आले आहे. माजी सरपंच शंकरराव खापे यांच्या मार्गदर्शनाखाली बनवडीची भरारी सुरू आहे. यावर्षी ग्रामपंचायतीस एकूण चार पुरस्कार मिळाले आहेत. आता दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण हा देशपातळीवरील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 24 एप्रिल 2020 रोजी दिल्लीत पुरस्कार वितरण होणार आहे. 25 लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ग्रामपंचायतीला आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
2019 मध्ये बनवडीस मिळालेले पुरस्कार
स्मार्ट ग्राम तालुकास्तरीय पुरस्कार : दहा लाख
स्मार्टग्राम जिल्हास्तरीय पुरस्कार : 40 लाख
संत तुकडोजी ग्रामस्वच्छता अभियान : 5 लाख
दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण : 25 लाख