कराची: प्रसिद्ध गायक मिका सिंग आणि त्याच्या टीमने पाकिस्तानातील एका विवाह समारंभामध्ये सादर केलेल्या कार्यक्रमामुळे नवीन वादंग निर्माण झाले आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या अब्जाधीश निकटवर्तीयाच्या मुलीच्या विवाह समारंभात मिका सिंगच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र सध्या भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर जोरदार आगपाखड केली जात आहे.
भारत सरकारने 370 कलम रद्द केल्यावर पाकिस्तानने भारताबरोबरचे व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत. त्यातच मिका सिंगचा कार्यक्रम 8 ऑगस्टला, गुरुवारी सादर झाला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही पाहुण्यांनी कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्यावर मिकाची उपस्थिती प्रकाशझोतात आली.
“या कार्यक्रमाला सुरक्षा कोणी दिली?’ असा प्रश्न विरोधी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते सय्यद खुर्शिद शाह यांनीसरकारला विचारला आहे. भारतीय् सिनेमे, नाटक, कार्यक्रमांवर बंदी असताना हा कार्यक्रम आयोजित कोणी केला. भारत सरकारकडे पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय कलाकारांचे व्हिसा रद्द करता येऊ शकले असते, असे शाह म्हणाले.
एका स्थानिक वर्तमानपत्राने मिका सिंग कराचीमध्ये आल्यचे आणि त्याच्या कार्यक्रमाबाबतचे वृत्त आगोदरच प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मिका सिंग, त्याचे कलाकारांचे पथक आणि अन्य सदस्यांना मोठी सुरक्षा देण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मिका सिंगने 1 लाख 50 हजार डॉलर इतके मानधन घेतले असल्याचे समजते आहे.
मिका सिंगने पाकिस्तानात कार्यक्रम केल्याबद्दल भारतातील पंजाबमधील फॅनकडूनही संताप व्यक्त व्हायला लागला आहे. त्यांनी सोशल मिडीयावर मिका सिंगची खरडपट्टी काढली. काही जणांनी त्याला चक्क देशद्रोही संबोधले आहे. पाकिस्तान दहशतवादी पाठवत असताना पाकिस्तानात का गेला ? काही पैसे देशापेक्षा जास्त महत्वाचे आहेत का? असा प्रश्न युजर्सनी मिका सिंगला विचारला आहे.