किल्ले शिवनेरीवरून राष्ट्रवादीच्या यात्रेचा शुभारंभ
जुन्नर-भाजपाची ‘महाजनादेश’ व शिवसेनेची ‘जनआशीर्वाद’ ह्या यात्रा मुख्यमंत्री पदासाठीच्या दावेदारांच्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा ही तुमच्या-माझ्या सारख्या मावळ्यांची आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते जुन्नर येथील सभेत बोलत होते. 370 कलम रद्द करण्यामागे देशातील ढासळलेली व कोलमडलेली अर्थव्यवस्था झाकण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कितीही कार्यकर्ते इकडून तिकडे गेले तरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पवार साहेबांच्या मागे भक्कमपणे उभा असून येत्या विधानसभेत सत्तापरिवर्तन होणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी जनतेला दिली.
मंगळवारी (दि. 6) सकाळी किल्ले शिवनेरीवर आई शिवाई देवीची आरती, गडावरील जिजाऊ व महाराजांच्या शिल्पास अभिषेक करून या यात्रेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी येथील पवित्र मातीचा मंगल कलश घेऊन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर जुन्नर शहरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, युवानेते अतुल बेनके, महिला राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांची भाषणे झाली. याप्रसंगी आमदार दिलीप वळसेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, सभापती ऍड. संजय काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदीप गारटकर, उपनगराध्यक्षा अलका फुलपगार, भाऊसाहेब देवाडे, दिनेश दुबे, धनराज खोत, भाऊ कुंभार, उज्वला शेवाळे, सुमित परदेशी, सूरज वाजगे, पूजा बुट्टे व जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, युती सरकार आल्यापासून वीजेचे, पाण्याचे दर वाढले. त्यातून घाऊक दरोडा कसा घालायचा हे फडणवीस सरकारने शिकवले. या सरकारने महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी केले असून लोकांवर विविध कर लादले आहेत. शिवस्वराज्य यात्रा 6 ते 28 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांतून सुमारे 3000 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनदेचे वाचन याप्रसंगी करण्यात आले. हाच पक्षाचा जाहीरनामा असल्याचे सांगण्यात आले. हा जाहीरनामा या यात्रेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेऊन जाणार असून राज्यातील अठरा पगड रयतेसाठी व मावळ्यांना जागविण्यासाठी ही यात्रा असल्याचे जाहीर करण्यात आले. ही यात्रा खासदार उदयनराजे भोसले व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात निघणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र शुभारंभप्रसंगीच उदयनराजे भोसले उपस्थित नसल्याची चर्चा होती.
- मराठा आरक्षण मिळविण्यासाठी समाजाला लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरावे लागले होते. त्यामुळे आरक्षण देऊन उपकार केल्याच्या भ्रमात शासनाने राहू नये. ईव्हीएमबाबत अनेकांना शंका आहे. या मुद्द्यावर येत्या 21 तारखेला मुंबई येथे सर्व पक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
-अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री - भारतीय जनता पक्ष म्हणजे काशीचा घाट झाला असून पक्षात मेगाभरतीद्वारे गुन्हेगारांना पवित्र करून घेण्याचे काम चालले आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेयश यात्रा नसून महाधनादेश यात्रा आहे. शिवाजी महाराजांचे स्मारकाचे काम अद्याप सुरु झाले नसून शिवछत्रपतींच्या नावाने आणलेल्या कर्जमाफीने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.
-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद