दौंड- भीमा नदीला महापूर आला असून पुराचे पाणी दौंड शहरातील काही भागात शिरले होते, त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. या स्थलांतरीत लोकांच्या व्यवस्थेबाबत आमदार राहुल कुल यांनी माहिती घेत संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दौंड तालुक्यातील पुल वाहतुकीसाठी आजही बंद ठेवण्यात आले होते. संध्याकाळी पाण्याचा विसर्ग कमी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेच्या सूचन तालुका प्रशासनाकडून करण्यात आल्या असून यासंदर्भात शासकीय विभागातील अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
आज, सकाळी माजी आमदार रमेश थोरात यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी करीत पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस केली. तर, दुपारी आमदार राहुल कुल यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून स्थलांतरीत लोकांची भेट घेवून त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार बालाजी सोमवंशी यांची भेट घेवून नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून मदत करता येईल, याबाबत सूचना केल्या.