वाहतुकीचा पूलही गेला पाण्याखाली
श्रीगोंदा – पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा आणि घोड या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नगर-दौंड रस्त्यावरील दौंड पूल आणि शिरूर-कर्जत रस्त्यावरील इनामगाव पूल पाण्याखाली गेले आहेत. या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असले, तरी नदीकाठचे नागरिक सुखरूप असल्याची माहिती मिळाली.
भीमा नदीचा दौंड पूल येथील विसर्ग दोन लाख 19 हजार क्यूसेस इतका असून, घोड नदीचा विसर्ग 42 हजार क्यूसेस इतका आहे. आज दुपारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व तहसीलदार महेंद्र माळी यांनी पथकासह बोटीने जाऊन आर्वी बेटाला भेट दिली. मात्र येथील लोकांनी आम्ही सुरक्षित आहोत. पुरेसा अन्नधान्य साठा आहे. केवळ पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी केली. यानंतर आर्वी बेटावर बोटीद्वारे शुद्ध पाणी पोहोच करण्यात आले. त्याचबरोबर सुरक्षेसाठी ‘एनडीआरएफ’ ची एक तुकडी आर्वी बेटावर तैनात करण्यात आली आहे.
रविवारी (दि. 4) सायंकाळी भीमा नदीवरील दौंड पूल पाणी पातळी वाढल्याने रात्री आठ वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तब्बल सतरा वर्षांनंतर दौंड पुलावरून पाणी वाहिल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घोड नदीवरील वांगदरी-इनामगाव शिवारातील पुलावरील वाहतूक देखील आज दुपारी बंद करण्यात आली. भीमा नदीवरील दौंड पूल व घोड नदीवरील इनामगाव पुलावर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने भीमा आणि घोड नद्यांना पूर आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. धोक्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. कोणतीही अडचण आल्यास महसूल अथवा पोलीस प्रशासनास संपर्क साधावा.
महेंद्र माळी , तहसीलदार.