इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा कमिटीची बैठक घेतली. भारतामध्ये अचानक वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर खान यांनी देशातील वरिष्ठ सनदी आणि लष्करी नेतृत्वाबरोबरही चर्चा सुरू केली आहे. भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या रहिवासी भागामध्ये क्लस्टर बॉम्बचा मारा केल्याच्या कथित वृत्ताच्या पार्श्वभुमीवर इम्रान खान यांनी ही बैठक घेतली. मात्र भारतीय लष्कराने शनिवारी क्लस्टर बॉम्ब वापरल्याचे पाकिस्तानचे आरोप धादांत खोटे आणि कपटकारस्थान असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा कमिटीच्या बैठकीला पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खट्टक, परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी, लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर इम्रान खान यांनी एका ट्विटद्वारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीरच्या मुद्दयावर मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. “ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्दयावर मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. भारतातील स्थिती बिघडली असून एलओसीवर नव्याने आक्रमकता दर्शवली जात आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रादेशिक आपत्तीचे निवारण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.’ असे इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या महिन्यात इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानदौऱ्यावर असताना आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केल्याचे धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मोदींनी असे कोणतेही आवाहन ट्रम्प यांना केल्याचे सरकारने फेटाळले आहे.
काश्मीरमधील नागरिकांना संयुक्त राष्ट्राच्या शांतता करारानुसार स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळायला हवा, असे इम्रान खान यांनी एका अन्य ट्विटमध्ये म्हटले आहे. काश्मीर मुद्दयावर तोडगा शोधल्यासच दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित केली जाऊ शकेल, असे इम्रान यांनी म्ह्टले आहे.