…गांधी कुटुंबीयांनी सक्रिय रहावे
नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी कुटुंबाशिवायही अन्य कोणी असू शकतो. मात्र गांधी कुटुंबीयांनी संघटनेमध्ये सक्रिय राहणे अत्यावश्यक आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे पक्षाध्यक्ष म्हणून यापुढेही कायम राहण्याबाबत असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभुमीवर त्यांनी हे मतप्रदर्शन केले आहे. भाजपने ठरवलेले “गांधी मुक्त कॉंग्रेस’हे उद्दिष्ट “कॉंग्रेसमुक्त भारत’यासाठीच आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष म्हणून कायम राहिले, तर ते सर्वात चांगलेच होईल. पण राहुल गांधी यांची स्वतःच्या ईच्छेचाही आदर राखला जायला हवा, असेही ते म्हणाले.
“जरी नेहरू-गांधी कुटुंबीयांच्या नेतृत्वाशिवायही आम्ही राहू शकतो. पण नेहरू-गांधींनी पक्षामध्ये सक्रिय राहिले पाहिजे. तसे झाले तर कोणतीही गंभीर समस्येचे निराकरण आम्ही करू शकतो.’ असे ते म्हणाले. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली मते व्यक्त केली.
राहुल यांनी पक्षाध्यक्ष निवडण्यासाठी पक्षाला जवळपास एक महिना दिला आहे. पक्षातून राहुल गांधी यांना उत्स्फूर्त पाठिंबा असल्याने या मुद्दयावर कॉंग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी तर्क न करता, राहुल यांच्याजागेवर कोणी अन्य नेता मिळतो का, राहुल स्वतःच अध्यक्ष म्हणून कायम रहतात हे जनण्यासाठी वाट पहावी. हा केवळ व्यक्तीपुरता मुद्दा नाही. “गांधीमुक्त कॉंग्रेस’ असे भाजपने ठरवले आहे, ते “‘कॉंग्रेसमुक्त भारत’साठीच ठरवले आहे. शिर वेगळे केल्यावर जनावर तडफडते. भाजपच्या त्याच सापळ्यामध्ये कॉंग्रेसने अडकायला नको, असेही अय्यर म्हणाले.
युएन धेबर यांच्यापासून ब्रम्हानंद रेड्डी यांच्यासारखे नेहरू-गांधी कुटुंबाशिवायही अध्यक्ष होऊन गेले आहेत. तसेच आताही होऊ शकते. सोनिया गांधी या संसदीय पक्षाच्या नेत्या आणि राहुल गांधी संसदीय पक्षाचे सदस्य आहेत. राहुल यांच्याऐवजी अन्य कोणी अध्यक्ष झाले तरी पक्ष पूर्वीची प्रतिष्ठा मिळवेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदचा राजीनामा देऊ केला आहे. मात्र कॉंग्रेस कार्यकारिणीने एकमताने हा राजीनामा फेटाळला आहे. पण राहुल गांधी राजीनाम्याव्र ठाम आहेत. आपला उत्तराधिकारी पक्षच ठरवेल, असेही ते म्हणाले आहेत.