पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार आज एकत्रित दुष्काळ दौऱ्यावर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती आणि दौंड तालुक्यातील गावांना ते भेटी देणार आहेत. बारामती तालुक्यातील खैरेपडळ येथील जनावरांच्या छावणीस भेट देऊन त्यांनी या दुष्काळ दौऱ्याला प्रारंभ केला आहे. लोकसभा निवडणुकीतला पराभव विसरून लगोलग शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर रवाना झाले होते.
काही दिवसांपूर्वी सोलापूर, अहमदनगर व बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावांना, पाण्याअभावी सुकलेल्या फळबागांना व चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली होती. तसेच शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रही लिहले होते. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळावर कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांची कैफियत व समस्या विस्तृत पत्रात मांडल्या होत्या.