-आनंद गावरस्कर
विश्वचषक स्पर्धा 2019ला थाटात सुरूवात झाली असुन यंदाच्या स्पर्धेतील पहिले काही सामने एकतर्फी झाल्याने चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडते की काय असे वाटत असतानाच त्या पुढचे दोन्ही सामने हे धक्कादायक निकाल नोंदवणारे ठरल्याने विश्वचषकातील आगामी सामन्यांबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत गट साखळी पद्धतीचा अवलंब न करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे विश्वचषक स्पर्धेतील धक्कादायक निकालांची हिच परंपरा आहे. गत तीन चार विश्वचषक स्पर्धांमध्ये धक्कादायक निकालांची नोंद केल्यानंतर बलाढ्य संघांना बाद फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला होता. ज्यात इंग्लंड, पाकिस्तान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. ज्यावेळी अशा धक्कादायक निकालांची नोंद झाली त्यावेळी पुढील फेरीतील सामन्यांचा निकाल निरस लागल्याने चाहते नाराज झाले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतील पद्धतीवर आधी टिका झाली मात्र नंतर ही पद्धत योग्य असल्याचे सर्वांनी मान्य केले.
एखादा कच्चा संघ जेव्हा बलाढ्य संघाला हरवतो तेव्हा स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद होते. ज्या संघाविरुद्ध आपण सामने सहज जिंकू शकतो अशा संघाने नेमके महत्वाच्या स्पर्धेतील महत्वाचा सामना जिंकत आपले स्पर्धेतील आव्हान संपवणे हे एकप्रकारे दुर्दैव मानले जाते. आणि हे दुर्दैव दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संघाच्या नशिबी विश्वचषक स्पर्धेत येते.
अशाच प्रकारचा धक्का भारतीय आणि पाकिस्तानी संघाला 2007 च्या विश्वचषक स्पर्धेत बसला होता.
2007च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला बांगलादेशने बाहेरचा रस्ता दाखवला होता. तर, पाकिस्तानला आयर्लंडने स्पर्धेबाहेर फेकले होते. त्याचप्रमाणे 2003च्या विश्वचषक स्पर्धेत केनियाने बांगलादेश, न्युझीलंड आणि श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर केले होते. तर, 2015 च्या स्पर्धेत बांगलादेशने इंग्लंडच्या संघाचा पत्ता कट करत विश्वचषक स्पर्धेतील धक्कादायक निकालांची परंपरा कायम राखली होती.
यंदा असेच दुर्दैव दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघासमोर आले आहे. या दोन्ही संघांना त्यांच्या तुलनेत आणि गत काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशकडून पराभव स्विकारावा लागला आहे.