आयुष्मान खुराना काम करत असलेल्या “बाला’ या आगामी सिनेमाच्या निर्मात्यांवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची कथा “चोरली’ असल्याचा आरोप लेखक कमल चंद्राने केला आहे. या तक्रारीमुळे निर्मात्यांमुळे आयुष्मान खुरानाही अडचणीत आला आहे.
आरोप सिद्ध झाले तर फसवणुकीच्या आरोपाखाली निर्मात्यांबरोबर त्यालाही शिक्षा होऊ शकते. हे प्रकरण गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबई हायकोर्टात सुरू आहे. “बाला’ची कथा चोरलेली असल्याने या सिनेमाचे शुटिंग ताबडतोब थांबवण्यात यावे, अशी मागणी कमल चंद्राने केली आहे. कोर्टात आता या प्रकरणी 10 जूनला सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या अख्त्यारित प्रकरण असल्याने आयुष्मान खुरानाच्यावतीने याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र “बाला’ची पटकथा मूळ आहे आणि सुनावणीच्यावेळी त्याची ओरिजिनल कॉपी कोर्टात दाखवली जाईल, असे आयुष्मानच्या वकिलांनी सांगितले. दुसरीकडे आपली कथा चोरल्याचा आरोप करणाऱ्या कमल चंद्राने आत पोलिसांची मदत घेण्याचीही तयारी केली आहे. आता यावर आयुष्मानची प्रतिक्रिया काय आहे, हे 10 तारखेच्या सुनावणीलाच समजू शकेल.