राजीव गांधींवरील टीकेवर साधला निशाणा
रायपुर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना सध्या पुरेशी झोप मिळत नाही. केवळ तीन ते चार तासांचीच झोप त्यांना मिळत असावी. ज्यांना कमी झोप मिळते त्यांचे असे मानसिक संतुलन ढासळते अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांच्यावर निवडणूक प्रचार काळात अत्यंत हीन भाषेत टीका केल्याने त्यावर प्रतिक्रीया देताना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी वरील टिपण्णी केली.
ते म्हणाले की राजीव गांधी यांचा देहांत होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. अशा व्यक्तींवर इतक्या वर्षांनी इतक्याखालच्या पातळीवर टीका करणे हे बिघडलेल्या मानसिक संतुलनाचेच लक्षण मानले पाहिजे. निवडणूक प्रचार काळात अशी टीका करणे हेही त्यांच्या अस्वस्थ मानसिकतेचेच लक्षण आहे असे त्यांनी म्हटले आहे. मोदींनी एका प्रचार सभेत राजीव गांधी यांचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर एक असा केला होता. राहुल गांधी यांना उद्देशून ते म्हणाले होते की तुमच्या वडिलांची प्रतिमा मिस्टर क्लीन अशी होती पण त्यांचा अंत मात्र भ्रष्टाचारी नंबर एक अशा संबोधनानेच झाला.
मध्यंतरी एका मुलाखतीत मोदींनी असे म्हटले होते की सध्याच्या व्यस्त प्रचार कामामुळे मला जेमतेम तीन ते चार तासच झोपण्याची संधी मिळते त्याचा संदर्भ देऊन छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की ज्या माणसाला झोप कमी मिळते त्याचे संतुलन ढासळण्याची शक्यता असते. मोदींचे बहुधा तेच झाले असावे.