भिलार (वार्ताहर)- महाबळेश्वर तालुका लोकसंख्येने कमी असल्या कारणाने लोकसभा निवडणुकीतील उमेदवार या तालुक्यात आपला जास्त वेळ वाया घालवत नाहीत. ज्याठिकाणी जास्त मतदान आहे अशा ठिकाणी ते आपला वेळ खर्च करत आहेत व प्रचाराची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघांत अनेक उमेदवार तरतालुक्यात अधिक प्रमाणात आपला प्रचार करताना दिसत आहेत. प्रत्येक उमेदवार गावागावांत गल्लीगल्लीमधून प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनीही जोर लावला आहे.
मी निवडून आल्यानंतर कोणकोणत्या सुविधा देऊ शकतो व आजअखेर मी जनतेसाठी काय केलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. मात्र, महाबळेश्वर, भिलार्, पाचगणी परिसरात दोन्ही प्रमुख उमेदवारांसह इतरांचाही प्रचार शांत असल्याचे चित्र आहे. ना कोणते बोर्ड, ना कोपरा सभा, ना जाहीर सभा, तसेच प्रचाराच्या गाड्याही गावोगावी फिरताना दिसत नाहीत.
निवडणुकांच्या या उत्सवात कार्यकर्ते जेवढे तन, मन लावून उमेदवारांचा प्रचार करतील तेवढ्या प्रमाणात मतदानाचा टक्का वाढलेला दिसतो. मात्र, कार्यकर्त्यांनी उदासीनता दाखवली. प्रचाराच्या कार्यात सहभाग नाही दाखवला तर मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी या ठिकाणी लक्ष घालून कार्यकर्त्यांना चार्ज करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मतदानाचा टक्का अधिक वाढण्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे.