नवी दिल्ली – चीनच्या प्रेमात पडल्यावर मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताच्या विरोधात फुत्कार सोडले होते. त्यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठच फिरवल्यामुळे आता मालदीवचा पर्यटन उद्योग आजारी पडला आहे. त्यांच्या टुरिझम ॲंड ट्रॅव्हल्स असोसिएशनने आता मदतीसाठी भारताला आवाहन केले आहे. या असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी भारतीय उच्चायुक्त मुनू महावर यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी पर्यटन व्यवसायात भारताने सहकार्य करावे, अशी गळ त्यांना घातली आहे. (Maldives plans to win back Indian tourists by organising roadshows in India)
महावर यांची भेट घेतल्यानंतर मालदीवच्या ट्रॅव्हल्स असोसिएशनने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की मालदीवमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील प्रमुख शहरांमध्ये रोड शो आयोजित केले जातील. त्याचसोबत भारतातील प्रभावशाली लोकांचा तसेच माध्यम परिचित लोकांच्या मालदीव भेटीच्या कार्यक्रमाची आखणीही केली जाणार आहे.
जानेवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप येथील एक फोटो प्रसिध्द झाला होता. त्यात लक्षद्वीपला एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रकाशात आणले गेले होते. त्यावरून मालदीवमधील तीन मंत्र्यांनी मोदी यांच्या संदर्भात अवमानजनक टिप्पणी केली होती.
ही बाब भारतीयांना न रूचल्यामुळे सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू झाला होता आणि मालदीवच्या विरोधात व्यक्त होणाऱ्यांची लाटच उसळली होती. संभाव्य नुकसानीचा अंदाज आल्यामुळे मालदीवने तातडीने आपल्या तीन मंत्र्यांची हकालपट्टीही केली. ते करूनही मालदीवच्या पर्यटन उद्योगाला जबर हादरा बसला आहे. त्या घटनेनंतर मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घसरणच होते आहे.
जानेवारीच्या अगोदर मालदीवच्या दृष्टीने भारतच सगळ्यांत मोठे मार्केट होते. २०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षांत मालदीवला भेट देणाऱ्यांमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सगळ्यांत जास्त होती. तेथील मीडिया अधाधुने दिलेल्या आकडेवारीनुसार मार्च २०२३ मध्ये ४१००० पेक्षा जास्त भारतीय पर्यटक मालदीवला गेले होते.
मात्र मार्च २०२४ मध्ये मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या २७ हजारपर्यंत खाली आली. २०२३ या पूर्ण वर्षात मालदीवला १७ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. यात भारतीय पर्यटकांची संख्या २ लाख १० हजार होती. कोणत्या बाहेरच्या देशांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येपेक्षा ही संख्या बरीच मोठी आहे. भारतानंतर रशिया आणि चीनचे नागरिक मालदीवला भेट देत असतात.