बेल्हे, (वार्ताहर) – अणे पठार (ता. जुन्नर) येथे पाण्यावरून ग्रामस्थ आधीच संतप्त झाले असून त्यांनी लोकसभा निवडणुकीवर आधीच बहिष्कार टाकला आहे. तर गुरुवारी (दि. 11) श्रीरंगदास स्वामी महाराज मंदिरात पाणी कमिटीची बैठक घेतली. दरम्यान, यापूर्वी ग्रामसभांनी घेतलेल्या बहिष्कार ठरावाला या बैठकीत हात उंचावत पाठिंबा देण्यात आला.
यावेळी पाणी समितीचे सदस्य गोरखनाथ शिंदे, भारतीय किसान संघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब दाते, देवस्थानचे माजी अध्यक्ष पोपट दाते, शिंदेवाडीचे माजी सरपंच रोहिदास शिंदे, एम. डी. पाटील शिंदे, इंजि.किरण आहेर, सरपंच प्रियांका दाते, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, नळवणेच्या सरपंच अर्चना, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
करण आहेर म्हणाले की, यापुढील काळात सर्व ग्रामस्थांनी राजकीय जोडे व मतभेद बाजूला ठेवून पाणी कमिटीच्या मागणीनुसार बहिष्काराच्या ठरावास एकमुखी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. यावेळी माजी सरपंच योगेश आहेर, आनंदा बेलकर, संतोष दाते, गुलाब दाते, प्रकाश दाते, बाळशिराम आंद्रे, विष्णू दाते, कान्हू हांडे, शंकर आहेर, जालिंदर आहेर, अरुण आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबाजी आहेर यांनी तर देवस्थानचे माजी अध्यक्ष विनायक आहेर यांनी आभार मानले.
या उपाययोजना राबविणार
सर्वांच्या मनोगतात एकच सूर जाणवला, तो म्हणजे वर्षभरापूर्वी ग्रामसभांनी मतदानावर टाकलेल्या बहिष्कार ठरावानुसार पाणी समितीची यापुढील दिशा ठरविणे, यामध्ये सर्वप्रथम गावोगावी बहिष्काराचे बॅनर्स, फ्लेक्स लावणे, पत्रके वाटणे, प्रचार दौर्याप्रमाणे पठारावर जनजागृती करण्यासाठी ध्वनीक्षेपक फिरविणे, वेळप्रसंगी प्रशासनास जाग आणण्यासाठी धरणे आंदोलन करणे आदी उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे मत नोंदविण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी कमिटीच्या आंदोलनाचे टप्पे व पाठपुरावा याबाबत बोलताना शासकीय यंत्रणेकडून ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत पठारावरील चारही गावांच्या ग्रामसभांनी पारित केलेला बहिष्कार ठराव मागे घेतला जाणार नाही या भूमिकेस उपस्थितांनी आजच्या बैठकीत हात उंचावत पाठिंबा दिला आहे.- मधुकर दाते, कार्याध्यक्ष, अणे पठार विकास संस्था