कलेढोण, {दीपक नामदे} – ‘नेते प्रचारात व्यस्त.. जनता मात्र दुष्काळाने त्रस्त’ अशी अवस्था खटाव तालुक्यातील पूर्व भाग असलेल्या कलेढोण परिसराची झाली आहे. पाण्याविना येथील जनजीवन पाण्याविना विस्कळीत झाले आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली असून दुष्काळाच्या भीतीने लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.
गत वर्षी खटाव तालुक्यात जेमतेम पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यानंतर परतीच्या पावसाने देखील पाठ फिरवल्याने परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीला पाणी नसल्याने जनावरांच्या हिरव्या चार्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. लोकांना पिण्यासाठी लागणार्या पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली आहे.
गावातील विहरी बोअरवेल, पाणी पातळी घटल्याने कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. शेती सह दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्याने येईल त्या भावात शेतकरी जनावरे विकू लागले आहेत.
दुष्काळाच्या भीतीने लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. मात्र, दुसरीकडे राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच पक्ष निवडणुकीची मोर्चे बांधणी करण्यात गुंतले आहेत. अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर झाले आहेत. तर अनेक ठिकाणी उमेदवार कोण हेच अजून गुलदस्त्यातच आहे.
सर्वच पक्षात वरिष्ठ नेत्यांच्यासमोर इच्छुकांची मनधरणी सुरु आहे. तर काहींनी उगाचच गुडघ्याला बाशिंग बांधून मतदार संघात प्रचार देखील सुरू केला आहे. या सगळ्या राजकारणाच्या खेळात लोकप्रतिनिधींना दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेचा मात्र विसर पडला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येत असलेला खटाव तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो येथील पूर्व भागात सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कलेढोणसह गारळेवाडी, तरसवाडी, विखळे, पाचवड, मुळीकवाडी कानकात्रे, कान्हरवाडी, आगासवाडी, ढोकळवाडी परिसरात होणारे पर्जन्यमान इतर तालुक्याच्या सरासरी 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात असते.
त्यात यंदा दुष्काळात तेरावा महिना काहीच पाऊस पडला नसल्याने सर्वत्र भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. लोकांच्या विहीर, बोअरवेल, कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी तरळत आहे.
पाणी पाणी करून जनतेच्या घशाला कोरड
निवडणुका या होतच राहतात, राजकारण होत असतेच. सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद पणाला लावून निवडणुका चुरशीने लढवल्या जातात. अनेक प्रलोभने दाखवली जातात. माण खटाव मधील जनतेसाठी हे नित्याचेच आहे. कितीही दुष्काळ पडला, कितीही मोठी पाणी टंचाई आली,
पाणी पाणी करून जनतेच्या घशाला कोरड जरी पडली तरी तालुक्यात नेत्यांचे पिक जोमातच वाढत असून जनतेला मात्र कोणी वाली राहिलाच नाही. जो तो आपल्या आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या प्रचारात व्यस्त आहे. प्रचाराच्या गोंधळात जनतेचा आवाज मात्र कुठेच पोहचत नाही. तालुक्यातील जनता दुष्काळाच्या संकटात असून पाण्यासाठी वणवण भटकत आहे.
सहाशे एकर द्राक्ष बागायत संकटात
परिसरातील जवळपास सहाशे एकर द्राक्ष बागा आहेत.यंदाच्या हंगामात कमी पावसामुळे प्रतिकूल परिणाम द्राक्ष बागांच्यावर झालेलं दिसून आले. यामधे द्रक्षातील साखरेचं प्रमाण कमी राहिल्याने वजनात देखील घट झाली असून यंदाच्या वर्षी बागायतदारांना समाधानकारक उत्पन्न न मिळाल्याने सर्वत्र नाराजी आहे. अशातच भीषण दुष्काळी परिस्थीत निर्माण झाल्यामुळे जवळपास सहाशे एकर द्राक्ष बाग क्षेत्र संकटात आहे.