नवी दिल्ली – कॉंग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर जुन्या मुस्लिम लीगच्या विचारसरणीचीच छाप दिसते आहे अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. विरोधी पक्ष आजच्या भारताच्या आशा आणि आकांक्षांपासून तुटलेला आहे आणि त्यांचा जाहीरनामा त्यांची विचारसरणी प्रतिबिंबित करतो असे ते म्हणाले. ते म्हणाले की जाहीरनाम्याच्या उर्वरीत भागावर डाव्यांचे वर्चस्व दिसते आहे.
सहारनपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस दशकांपूर्वी संपली असे देशातील लोकांना वाटते. ते म्हणाले की, काल काँग्रेसनं आपला जाहीरनामा ज्या प्रकारे प्रसिद्ध केला, त्यावरून हे सिद्ध झालं की, आजची काँग्रेस आजच्या भारताच्या आकांक्षा आणि अपेक्षांपासून दूर आहे.अशी काँग्रेस भारताला २१व्या शतकात पुढे नेऊ शकत नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता आणि महात्मा गांधींसह अनेक दिग्गज काँग्रेसशी संबंधित होते. आज देश एका आवाजात बोलतोय की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जी काँग्रेस लढली, ती दहा वर्षांपुर्वीच संपली आहे आज उरलेल्या काँग्रेसकडे ना देशहिताची धोरणे आहेत ना देशाच्या प्रगतीची दृष्टी,असे ते म्हणाले.
मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावरही या दोन्ही पक्षांमधील युतीबाबत जोरदार हल्लाबोल केला. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत या दोघांची आघाडी अपयशी ठरली होती. आणि आता दो लडकों की फ्लॉप फिल्म पुन्हा प्रदर्शित झाली आहे. इंडिया आघाडी ही कमिशनच्या मिशनवर आहे असा आरेापही त्यांनी केला.
ते म्हणाले की, पक्षाला त्यांच्या बालेकिल्ल्यांमधूनही उमेदवार शोधणे कठीण जात आहे आणि अशी काही उदाहरणे आहेत की पक्षाचे उमेदवार उमेदवारी दाखल करण्यासाठीही आले नाहीत. ही पहिली निवडणूक मी पाहत आहे जिथे विरोधक जिंकण्यासाठी नव्हे तर भाजपला 370 पेक्षा कमी आणि एनडीएला ४०० पेक्षा कमी जागा मिळवून देण्यासाठी लढत आहेत. समाजवादी पक्षाची अशी स्थिती आहे की त्यांना प्रत्येक तासाला उमेदवार बदलावे लागतात आणि काँग्रेससाठी त्याहूनही वाईट स्थिती आहे. त्यांना उमेदवार सापडत नाहीत असे ते म्हणाले.
भाजपने आपल्या कामातून लोकांचा विश्वास जिंकला आहे. आज भाजपचा स्थापना दिवस आहे. अवघ्या काही दशकात विक्रमी संख्येने देशबांधव भाजपमध्ये सामील झाले आहेत. भाजप राजकारण करत नाही तर राष्ट्रीय धोरण पाळते. भाजपसाठी देश प्रथम येतो, ही भाजपची घोषणा नसून तो आमचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
देश निराशा आणि संकटाच्या काळातून जात असल्याचे सांगत त्यांनी त्यावरून यूपीए राजवटीवरही हल्लाबोल केला. दहा वर्षांपूर्वी मी सहारनपूरला एका निवडणुकीच्या सभेसाठी आलो होतो. त्यावेळी देश प्रचंड निराशेच्या आणि मोठ्या संकटाच्या काळातून जात होता. मी त्यावेळी तुम्हाला हमी दिली होती की, मी देशाला झुकू देणार नाही. तुमच्या आशीर्वादाने मी निराशेचे आशेत, आशेचे विश्वासात रूपांतर करेन, असा संकल्प केला होता. तुम्ही तुमच्या आशीर्वादात कोणतीही कसर सोडली नाही आणि मोदींनीही आपल्या मेहनतीत कोणतीही कसर ठेवली नाही, असे ते म्हणाले.