IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings : आयपीएल 2024 मध्ये शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात पॅट कमिन्सच्या संघाने महेंद्रसिंग धोनीच्या संघाचा सहज पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने प्रथम खेळताना 20 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 11 चेंडू शिल्लक असताना सहज विजय मिळवला.
चेन्नईने आपल्या तीन खेळाडूंच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे हैदराबादविरुद्धचा सामना गमावला. हे तीन खेळाडू चेन्नईच्या पराभवाचे खलनायक ठरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या तिघांनीही अपेक्षित कामगिरी केली नाही आणि त्यामुळे चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
1. मुकेश चौधरी : चेन्नई सुपर किंग्जच्या या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी ठरला. या मोसमात आपला पहिला सामना खेळणाऱ्या मुकेशने ( Mukesh Chaudhary ) त्याच्या पहिल्याच षटकात 27 धावा दिल्या, तर त्याच्या आधी टाकलेल्या षटकात दीपक चहरने केवळ सात धावा दिल्या होत्या. मुकेशच्या या महागड्या षटकामुळे हैदराबादने पॉवरप्लेमध्येच आपला विजय निश्चित केला होता. यानंतर मुकेशला पुन्हा षटकही दिले गेले नाही.
2. रचिन रवींद्र : डावखुरा स्फोटक फलंदाज रचिन रवींद्र ( Rachin Ravindra ) पुन्हा एकदा फ्लॉप झाला. रचिनने 9 चेंडूत केवळ 12 धावा केल्या. न्यूझीलंडचा हा खेळाडू चेन्नईला चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरला. सुरुवातीला धावा पटकन झाल्या नाहीत आणि नंतर रचिन बाद झाल्यामुळे कर्णधार गायकवाडही मोकळेपणाने खेळू शकला नाही. हैदराबादविरुद्ध चेन्नईच्या पराभवामागे रचिनचा फ्लॉप हेही प्रमुख कारण होते.
3. अजिंक्य रहाणे : या यादीत अजिंक्य रहाणेचे नाव पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल, कारण या सामन्यात रहाणेने 35 धावा केल्या. मात्र, रहाणेच चेन्नईच्या पराभवाचे कारण कसा बनला हे सविस्तर जाणून घेतल्यानंतर तुम्हीही होच म्हणाल. वास्तविक, रहाणेने ( Ajinkya Rahane ) निश्चितपणे 35 धावा केल्या, परंतु त्याच्या स्ट्राइक रेटने(धावगती) चेन्नईला खाली नेले. रहाणेने जवळपास 116 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या संथ फलंदाजीमुळे गायकवाडवर मोठे फटके खेळण्याचे दडपण आले आणि यामध्ये त्याने आपली विकेट गमावली.
यानंतर जरी शिवम दुबेने झटपट धावा काढत चौकार आणि षटकार खेचले, मात्र रहाणेच्या संथ खेळीमुळे धावफलकावर फारशा धावा होऊ शकल्या नाहीत. रहाणेने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. म्हणजेच त्याने अवघ्या 3 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. याचा अर्थ त्याने उर्वरित 27 चेंडूत केवळ 21 धावा केल्या आणि हेच चेन्नईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले.