वीसगाव खोरे,(वार्ताहर) – भोर तालुक्यातील पश्चिम भागातील नीरा देवघर धरण रिंगरोवरील प-हर बुद्रुक येथील कचरे वस्ती व उंब्राटकर वस्ती येथील ग्रामस्थांची दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय होऊन पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने तेथील ग्रामस्थांनी टँकरचा प्रस्ताव पंचायत समीती पाणी पुरवठा विभागाकडे दिला असून येथील ग्रामस्थ आता टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
पाणी टंचाईमुळे महिलांना दोन किलोमीटर पायपीट करुन धरणातून डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. त्यात धरणातून पाणी आणताना चढ असलेली संपूर्ण पाय वाट असल्याने महिलांची भर उन्हाळ्याच्या दिवसात चांगलीच दमछाक होते आहे.
तर निगुडघर येथून पीकअप गाडीने अथवा चारपाच कुटुंब मिळून टँकर मागवून विकतचे पाणी आणावे नागरिकांना आणावे लागत आहे. सध्या पाण्यासाठी जास्तीचा वेळ द्यावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी लवकर टँकर चालू करण्याची मागणी होत आहे.
कचरे वस्ती येथे ६०-७० तर उंब्राटकर वस्ती येथे ४०-५० लोकसंख्या आहे. प-हर गावठाण येथील पाईल लाईनवरुन पाणी नेहण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी संस्थेकडून पाईप दिला आहे. तर लोकवर्गणी व ग्रामपंचायत निधीमधून चारी खोदून, पाईप जोडणीचा मंजूरी व इतर खर्च अंदाजे दीड लाख झाला आहे. अजून ५० हजार खर्च अपेक्षित आहे. प-हर बुद्रुकमधील आखाडेवस्ती, कचरेवस्ती, डोईफोडे वस्ती, उंब्राटकर वस्ती येथील लोकांना दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते.
३९ लाख रुपये निधीतून प-हर गावठाणसाठीची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली आहे. परंतू या योजनेत मोटारीने धरणातील पाणी उचलले जाते. सध्या नीरा धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्याने पाणी तळ गाठत आहेत. पर्यायाने योजनेचे पाईप उघडे पडत आहेत. पाणी अजून खाली गेल्यावर पाईप अपुरे पडणार आहेत. सहाजिकच त्यावेळी गावठाणसह सर्वच वाडी वस्त्यांना पाणी टंचाई भासणार आहे.
पुढील ऐन उन्हाळ्याच्या दिवसात येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असते. मीनाताई ठाकरे योजने अंतर्गत १ कोटीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केलेला आहे. त्यास मंजुरी मिळाली तर प-हरचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल तसेच तसेच कायम स्वरुपी पाण्यासाठी नवीन विहीर व इतरसाठी जल जीवन मशीन अंतर्गत सुधारीत प्रस्ताव सादर केला आहे, असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
या गावांचे टँकरचे प्रस्ताव
प-हरमधील कचरे वस्ती, उंब्राटकर वस्ती, उंबर्डे शिळिंब, राजीवडी,नानावळे शिंदे वस्ती, करंदी खेबा, या ठिकाणी पाणी टंचाई जाणवत असून यांचे टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत. तसेच पुढील काही दिवसात अजूनही १०-१२ गावांतून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाणी टंचाई अधिक जाणवणार आहे.
प-हर हा भाग पूर्ण डोंगराळ असल्याने उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत कमी होऊन शिवकालीन टाक्या,विहरी कोरड्या पडल्या जात असल्यामुळे डोंगरदरे फिरून तसेच २ किमी धरणावरुन पायपीट करत पाणी आणावे लागते. उन्हाळ्यात पंचायत समितीला प्रत्येक वेळी टॅंकरचा प्रस्ताव दिला जातो. ही कायमस्वरूपीची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना करावी. -रामभाऊ कचरे, ग्रामस्थ प-हर बु. (ता.भोर)
धरणात असलेल्या बोअरवेलमध्ये मोटर अडकल्याने ती पाईप लाईन बंद आहे. ग्रामपंचायतीमार्फत नवीन बोअरवेल घेण्यात येणार आहे. परंतू त्यासाठी धरणातील पाणीसाठा अजून कमी होऊन तेथील ओलावा हटल्यानंतर तेथे बोअरवेलची गाडी नेणे शक्य होणार आहे. त्यासाठी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे.- महेश कालेकर,ग्रामसेवक,प-हर बु.(ता.भोर)
टँकरचा प्रस्ताव तात्काळ तहसील विभागाकडे सादर करण्यात आला आहे. दोनचार दिवसातच टँकर सुरू होईल. टंचाईपूरक आराखड्यात २० लक्ष निधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. -ए. ए. आडे, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, भोर