पिंपरी (प्रतिनिधी) – पार्क केलेल्या दुचाकीला रिक्षाची धडक लागून महिला खाली पडली. या कारणावरून झालेल्या भांडण झाले. त्यानंतर रिक्षा चालकाचा मृतदेह आढळून आला. याबाबत मयत रिक्षा चालकाच्या भावाने खून झाल्याची फिर्याद दिली. मात्र पोलीस तपासात हा अपघात असल्याचे दिसून येत आहे. ही घटना शनिवारी (दि. ३०) सायंकाळी घडली.
रिझवान यासीन मणियार (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. फरमान यासीन मनियार (वय 30, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी रविवारी (दि. 31) हिंजवडी पोलीस ठाण्यात आपल्या भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३० ते ३२ वर्षीय महिला व तिचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मयत तरुण रिझवान याच्या रिक्षाचा धक्का पार्क केलेल्या दुचाकींना लागल्याने मयत रिझवान आणि ३० ते 32 वयाच्या अनोळखी महिलेसोबत वाद झाला. त्यानंतर तिने तिचा पती किंवा नातेवाईक यांना बोलावून घेतले.
आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ रिझवान यास कानाखाली मारले. या घटनेनंतर रिझवान याचा मृतदेह आढळून आला. रिझवान याला मारहाण केली तसेच गुप्तांगांमध्ये शस्त्र खूपसून खून केला असे प्रथमदर्शनी वाटल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस तपासात हा खून नसून अपघात असल्याचे दिसून आले आहे. मयत रिझवान यांच्या गुप्तांगामध्ये शस्त्राचा वार नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून दिसून आले. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा बदलण्यात आली आहे.