नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अखेर माफी मागितली आहे. या प्रकरणी भाजपनेही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले हेाते. त्यांच्या विधानावर जोरदार प्रतिक्रीया उमटत होत्या त्यामुळे त्यांनी अखेर माफी मागितली आहे.
आपल्या शब्दांच्या निवडीबद्दल माझा पक्ष आणि इतर लोकांचे आक्षेप आहेत, जर तसे असेल तर मला त्याबद्दल खेद वाटतो असे त्यांनी एका निवेदनात नमूद केले आहे. तृणमुल कॉंग्रेसने त्यांच्या टिप्पण्यांबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले घोष म्हणाले की, त्यांचे मुख्यमंत्र्यांशी कोणतेही वैयक्तिक वैर नाही.माझ्या टिप्पण्यांवरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही कारण मी चुकीचे काम करणाऱ्यांच्या तोंडावर त्यांना सुनावतो.तथापि ममता बॅनर्जी यांच्या विषयी माझ्याकडून झालेल्या विधानांचा मला खेद वाटतो आणि त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.
तथापि, त्यांनी नमूद केले की त्यांच्या टिप्पण्यांवर महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित झाला असला तरी, तृणमुलच्या एका नेत्यानेही विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे वडील शिशिर अधिकारी यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरले होते. सुवेंदू हेही एक माणूसच आहेत म्हणून त्यांना आदराची अपेक्षा नाही का?” असा सवाल घोष यांनी दुर्गापूर येथे पत्रकारांशी बोलताना केला.
ममतांनी बंगालला स्व:ताची मुलगी हवी असे नमूद करून मतदारांना तृणमुलला मतदान करण्याचे आवाहन केले होते.त्याची खिल्ली उडवताना दिलीप घोष म्हणाले की, गोव्यात गेल्यावर आपण गोव्याची मुलगी असल्याचे त्या सांगतात. त्रिपुरात त्या त्रिपुराची मुलगी असल्याचे सांगतात. त्यामुळे आपण नेमकी कोणाची मुलगी आहोत हे ममतांना आधी स्पष्ट करू द्या, असे विधान त्यांनी केले होते.
भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले की त्यांचा पक्ष महिलांबद्दलच्या अशा टीकेचे समर्थन करत नाही आणि ते देखील मुख्यमंत्री असलेल्या एखाद्या महिलेच्या विरोधात असे वक्तव्य योग्य नाही आणि म्हणूनच पक्षाने घोष यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.