नारायणगाव, (वार्ताहर)- तरुणांचे लग्न जमण्यासाठी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचे लग्न जमणे अवघड बनू शकते, असे जयहिंद संस्थेचे अध्यक्ष व लाला अर्बन बँकेचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी म्हटले आहे.
नारायणगाव येथे स्वसकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेने आयोजित 83 व्या वधू-वर परिचय मेळाव्यात बोलत होते. मेळाव्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे गणपतराव फुलवडे, शिवसेनेचे सुरेश भोर, हभप माऊली कबाडी, अखिल भारतीय भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, जयहिंद कॉलेजचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, भागेश्वर महाराज सामुदायिक विवाह समितीचे कार्याध्यक्ष संजय वारुळे, अध्यक्ष शंकर ढवळे,
सचिव अॅड. राहुल गरुड, छावाच्या महिला अध्यक्षा संगीता नाईकरे, राज्य सचिव अर्चना पडवळ, मराठा सोयरीक संस्थेचे नानासाहेब दानवे, सुकांता कावळे, प्रतीक्षा वारुळे, दिपाली गरुड, संपत शिंदे, रामकृष्ण जाधव, अशोक गुंड, नितीन कांबळे, पुजा पवार, राजेश मोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गुंजाळ म्हणाले की, मेळाव्यामध्ये 1100 उपवर वधु-वर, पालकांची उपस्थिती होती; मात्र 290 मुलांची तर 27 मुलींची विवाहासाठी नाव नोंदणी झाली ही खेदाची बाब आहे. नोंदणी झालेल्या 290 मुलांपैकी 255 मुले दहावी व बारावीपर्यंतचे कमी शिक्षण घेतलेले आहेत.
हल्लीच्या काळात मुली चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहत असल्याने लग्नाळू मुलांनी किमान यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतरच लग्न जमेल अन्यथा लग्न होणे कठीण आहे. मेळाव्यासाठी भागेश्वर महाराज मोफत सामुदायिक विवाह समिती, मराठा विकास प्रतिष्ठान व छावा संघटनेचे सहकार्य लाभले.