कोयनानगर, (वार्ताहर) – तीन वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील आठ गावांवर दरड कोसळून आणि भूस्खलनाने मोठी जीवित व वित्तहानी झाली होती. या दरडग्रस्त गावांमधील 466 कुटुंबे उघड्यावर पडली होती. आता या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन शिद्रुकवाडी (धावडे) येथे होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या, दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या बाधित कुटुंबांना पक्की घरे देण्यसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 164 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
आंबेघर (खालचे आणि वरचे), ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी आणि काहीर येथील बाधित कुटुंबांचे या प्रकल्पात कायमस्वरूपी पुनर्वसन होणार आहे. याप्रसंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भूमिपूजन आणि सभेसाठी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुकावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.