Lok Sabha Election 2024 : राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारींच्या उपस्थितीत कोणाला कसलीच कुणकुण लागू न देता अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून 23 नोव्हेंबर 2019 या तारखेला शपथ घेतली. या शपथविधीचे फोटो प्रसार माध्यमांच्यासमोर आल्यानंतर सगळ्यांचीच झोप उडाली.
पण त्यावेळी जर अजित पवारांनी माघार घेऊन पुन्हा त्यांच्या काकांना म्हणजेच शरद पवारांना साथ दिली नसती तर कदाचित त्याचवेळी राष्ट्रवादी पक्ष फुटला असता, असा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.
एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांच्याकडून हा खुलासा करण्यात आला आहे. आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, म्हणून त्यांना धडा शिकवला. तर शरद पवारांनी 2019 मध्ये बोलणी करूनही काँग्रेस आणि शिवसेनेशी हातमिळवणी केली म्हणून त्यांनाही धडा शिकवला.
त्यांच्या या विधानावर “2019 ला भाजप राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत जनतेला दगा द्यायला तयार होते, असे पत्रकाराने विचारले असता, याबाबत खुलासा करत शेलारांनी सांगितले की, जनतेशी आम्ही कोणताही दगा केलेला नाही आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलेलोही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.