Anganwadi Sevika Vijay wadettivar ajit pawar : मुंबईतील आझाद मैदानावर आशा सेविकांचे गेल्या काही महिन्यांपासून वेतनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यासांठी आंदोलन सुरू आहे. कुपोषित बालकांची सेवा करणाऱ्या आशा सेविकांची सरकारला कदर नाही, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
त्याचबरोबर सरकारने राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली. या प्रश्नाला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला आजपासून (ता. 26 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशीच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर हे आशा सेविकांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सरकारला आशा सेविकांची कदर नाही, असे म्हटले. यावेळी ते सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
विधानसभेत आशा सेविकांच्या मुद्द्यावरून बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, आपण पुरवणी मागण्या तर मांडणारच आहोत. परंतु त्याआधी आशा सेविकांचा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्यातील 80 ते 82 हजार आशा सेविका सव्वा महिन्यांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या 7 हजार रुपये वाढीच्या मागणीवर प्रस्ताव आणून ती मागणी पूर्ण करावी, असे वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
सरकार मागण्यांबाबत सकारात्मक
याबाबत सरकारने अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली आहे. सरकार त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. पण जी मागणी केली ती तशीच पूर्ण केली पाहिजे, असे म्हणणे चुकीचे असून सरकारला आर्थिक बाबीही तपासाव्या लागतात. त्यामुळे आशा वर्कर्सच्याबाबतीत सरकार सकारात्मक असून त्यांनी चर्चेसाठी येऊन हा विषय संपवावा, अशी सरकारची भूमिका असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.