पारदर्शकपणे सामाजिक कार्य केल्याबद्दल होते कौतुक
श्रीरामपूर – सकल मराठा समाजाने मुंबईकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील एक लाख मराठा बांधवांना भोजन दिले होते. त्याकरिता झालेल्या जमाखर्चाचा लेखा-जोखा जाहीर करण्यात आला आहे. त्यामधून १ लाख १७ हजार रुपये शिल्लक राहिले असून त्याचा उपयोग मराठा आरक्षणासाठी करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
सकल मराठा समाज ,श्रीरामपूर यांचेवतीने व तालुक्यातील जनतेच्या सहकार्याने मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाणाऱ्या पायी दिंडी मोर्चातील एक लाख मराठा समाज बांधवांना भोजन देण्यात आले होते. नगर तालुक्यातील बाराबाभळी या ठिकाणी देण्यात आलेल्या भोजनाकरिता श्रीरामपूर शहर व तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक संघटना, संस्था, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक व सर्व समाजातील बांधवांनी आर्थिक व वस्तूरुपी (शिधा) देऊन योगदान दिले होते. अन्नदानासाठी आलेल्या वस्तूरुपी मदतीचा जमा-खर्च जाहीर करण्यात आला आहे.
आजपर्यंत सकल मराठा समाजाने पारदर्शी कारभार ठेवला असून यापुढील काळातही त्याच पद्धतीने कार्य सुरू राहील असे म्हटले आहे.थत्ते मैदान येथे जाहीर सभेसाठी झालेल्या खर्चाचाही तपशील यापूर्वी जाहीर केला होता. याकरिता ६ लाख ५७ हजार ४३१ रुपये जमा झाले तर एकूण खर्च ६ लाख ४९ हजार ८६१ रुपये झाला आहे. त्यामध्ये नाना केटरर्स मार्फत १०० महिला स्वयंपाकी, पॅकिंग,मदतनीस, वाढपी २०० पुरुष व २०आचारी यांचा खर्च ३ लाख ८६ हजार रुपये, किराणा व मसाला ५७ हजार ६८६ रुपये, भाजीपाला २५ हजार ५२५ रुपये, कॅरेट व इतर वाहतूक खर्च, हमाली २६ हजार रुपये, नगर येथे तीन ट्रक मध्ये तयार झालेले भोजन घेऊन जाणेसाठी खर्च ३१,५०० रुपये,
पाणी पाऊच ३० हजार रुपये, जेवणासाठी कंटेनर ६३ हजार रुपये, मंगल कार्यालय साफसफाई व इतर ११,६३० रुपये, फ्लेक्स बोर्ड, वाद्य, फटाके १८,५२० रुपये याप्रमाणे खर्च झाला होता. त्यामधील शिल्लक ७,५७० रुपये इतकी असून वस्तू स्वरूपात मिळालेले ९८ हजार १३३ रूपये तर जाहीर सभेतील मागील शिल्लक असलेली रक्कम ११,७३१ इतकी आहे. एकूण शिल्लक रक्कम १ लाख १७ हजार ४३४ रुपये जमा असल्याचे संयोजकांनी सांगितले. शिल्लक राहिलेली रकमेचा उपयोग हा फक्त मराठा आरक्षणासाठी यापुढील काळात करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.एक लाख मराठा बांधवांच्या भोजनासाठी सकल मराठा समाज व अखंड मराठा समाजाच्या वतीने लेखा-जोखा जाहीर करून पारदर्शकपणे सामाजिक कार्य केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले जात आहे.