वाराणसी – राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उत्तरप्रदेशात जो प्रतिसाद मिळाला आहे तो पहाता ही यात्रा देशात मोठा राजकीय बदल घडवून आणेल असा विश्वास उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी व्यक्त केला आहे.
ही यात्रा काल उत्तरप्रदेशात आली त्यावेळी यात्रेला लोकांचा अभुतपुर्व पाठिंबा मिळाला होता असे त्यांनी म्हटले आहे. आज यात्रा वाराणसी या मोदींच्या मतदार संघात येणार आहे, त्या पाश्र्वभूमीवर पांडे बोलत होते.
त्यांनी वाराणसी यात्रेच्या कार्यक्रमाचीही माहिती प्रसार माध्यमांना दिली. ते म्हणाले की काल आम्ही या यात्रेत लोकांचा महापूर पाहिला. राहुल गांधींच्या पाच कलमी न्यायाच्या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी लोक उत्साहित आहेत.
त्यासोबतच लोकशाही वाचवण्यासाठी या यात्रेत सहभागी होण्यासाठी ते उत्साही आहेत. ज्या प्रकारे राज्यघटना कमकुवत केली जात आहे आणि त्याची मूल्ये कमी केली जात आहेत, त्याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील याची जाण लोकांना आहे,
त्यामुळे या यात्रेत अनेकजण मोठ्या संख्येने सामील होत आहेत. आम्हाला आनंद आहे की या यात्रेच्या या उत्तरप्रदेशातील ८ दिवसांमध्ये, कॉंग्रेस पक्षाविषयी आशादायी चित्र निर्माण हेाईल. निवडणुकीच्या काळात काँग्रेसवर चारी बाजूंनी हल्ला होत आहे,
सुरुवातीला सर्व नेत्यांच्या घरांवर ईडी आणि आयकर छापे टाकण्यात आले होते. आता त्यांना धमकावले जात असून, लोकांना यात्रेत येण्यापासून रोखले जात आहे. असे असूनही, लोक स्वयंस्फुर्तीने प्रतिसाद देत आहेत असे ते म्हणाले.
काल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसची खाती गोठवण्यात आली. सर्वात जुना आणि सर्वात राष्ट्रीय पक्ष असल्याने,काँग्रेस पारदर्शकपण आपल्या खात्याचे वार्षिक लेखापरीक्षण करते,
तरीही चुकीची माहिती पसरवण्यासाठी आणि काँग्रेस नेत्यांचे मनोधैर्य खचण्यासाठी काल ही कारवाई करण्यात आली. सत्ताधारी पक्षाने कोणत्याही पुराव्याशिवाय दुसऱ्या राष्ट्रीय आणि जुन्या पक्षाची खाती जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असावी असे ते म्हणाले.